यावेळी, रेपो दर ५.२५% वर कायम ठेवण्यात आला आहे. याचा अर्थ कर्जे महाग होणार नाहीत आणि तुमचे ईएमआयही वाढणार नाहीत. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेने (RBI) व्याजदर 0.25% ने कमी करून 5.25% केले. RBI बँकांना ज्या दराने कर्ज देते त्याला रेपो दर म्हणतात. जेव्हा आरबीआय रेपो दर कमी करते तेव्हा बँकांना स्वस्त कर्ज मिळते आणि ते हा फायदा ग्राहकांना देतात.
महागाई पूर्णपणे नियंत्रणात :
एमपीसी बैठकीच्या निर्णयाबाबत अपडेट देताना, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणाले की, जागतिक स्तरावर अनिश्चितता असली तरी, भारतातील महागाई पूर्णपणे नियंत्रणात आहे. महागाई आरबीआयच्या लक्ष्यापेक्षा कमी आहे. महागाई ४% च्या आसपास आहे, याचा अर्थ असा की आपल्या उद्योगाला आणि देशाला महागाईचा मोठा दबाव येत नाही.
जीडीपी आणि महागाईसाठी नवीन आधार वर्ष :
गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले की, येत्या दोन दिवसांत भारताला जीडीपी आणि महागाई या दोन्हीसाठी नवीन आधार वर्ष मिळणार आहे. ते म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था लवचिक आहे आणि देशांतर्गत महागाई आणि विकास निर्देशक सकारात्मक आहेत.
केंद्रीय बँकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा विकासदराचा अंदाज ७.३ टक्क्यांवरून ७.४ टक्के केला आहे. २०२६ च्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अनेक उपाययोजना विकासाला अनुकूल ठरतील, असे ते म्हणाले.
शेअर बाजारात घसरण :
रेपो दरात कोणताही बदल न झाल्याने शेअर बाजारात घसरण दिसून आली. सेन्सेक्स ३४० अंकांनी घसरून ८३,००० च्या खाली आला, तर निफ्टी १५० अंकांनी घसरून २५,५०० च्या खाली व्यवहार करत होता. बँक निफ्टीमध्येही जवळपास ३०० अंकांची घसरण दिसून आली.