Friday, May 16, 2025 12:51:19 PM

India Pakistan War: भारताकडून पाकिस्तानचे 6 हवाई तळ उद्ध्वस्त

भारताने पाकिस्तानमधील रफीकी, चकलाला, रहिमयार खान, मुरीद, सुक्कूर आणि चुनिया येथील पाकिस्तानी लष्करी तळांवर हल्ले केले.

india pakistan war भारताकडून पाकिस्तानचे 6 हवाई तळ उद्ध्वस्त
India destroys 6 Pakistani air bases
Edited Image, X

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानी लष्कर सीमेलगतच्या भागात सामान्य नागरिकांना लक्ष्य करत आहे. काल रात्री 1:40 वाजता, पाकिस्तानने पंजाबमधील एअरबेस स्टेशनवर हायस्पीड मिसाईल डागले. परंतु, भारतीय लष्कराने ते नष्ट केले. यानंतर, भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानात घुसून 8 ठिकाणी हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे बरेच नुकसान झाले आहे. पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तानवर भारताबद्दल खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोपही केला. यादरम्यान, कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तानचे खोटे दावे उघड केले.

पाकिस्तानी सैन्याकडून सीमेवर आक्रमक कारवाया - 

दरम्यान, कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने संपूर्ण पश्चिम सीमेवर आक्रमक कारवाया सुरू ठेवल्या आहेत. यामध्ये ड्रोन आणि इतर लढाऊ विमानांचा वापर करून भारतीय लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले. नियंत्रण रेषेवरही जड कॅलिबर आणि ड्रोन शस्त्रांनी गोळीबार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवरील श्रीनगर ते नालियापर्यंत 26 हून अधिक ठिकाणी हवाई घुसखोरीचे प्रयत्न करण्यात आले. भारतीय सशस्त्र दलांनी बहुतेक धोके निष्प्रभ केले. 

पाकिस्तानचे 6 हवाई तळ उद्ध्वस्त - 

पाकिस्तानने पहाटे 1.40 वाजता हाय-स्पीड क्षेपणास्त्रांचा वापर करून पंजाबमधील एअरबेस स्टेशनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तथापि, पाकिस्तानने श्रीनगर, अवंतीपूर आणि उधमपूर येथील हवाई दलाच्या तळांवरील वैद्यकीय केंद्रे आणि शाळेच्या परिसरांना लक्ष्य केले. पाकिस्तानने जाणूनबुजून लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य केल्यानंतर, भारतीय लष्करानेही पाकिस्तानच्या हवाई तळांना लक्ष्य केले. भारताने पाकिस्तानमधील रफीकी, चकलाला, रहिमयार खान, मुरीद, सुक्कूर आणि चुनिया येथील पाकिस्तानी लष्करी तळांवर हल्ले केले. 

हेही वाचा - जम्मू-काश्मीरमधील शाळा आणि महाविद्यालय 12 मेपर्यंत बंद

भारताची S-400 हवाई संरक्षण प्रणाली सुरक्षित - 

पाकिस्तानने भारताच्या अनेक हवाई संरक्षण प्रणाली आणि लष्करी तळांचे नुकसान केल्याचा खोटा दावा केला आहे. पत्रकार परिषदेत पुरावे दाखवून कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तानचे खोटे दावे उघड केले. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानकडून आदमपूरमधील एस-400 प्रणाली, सुरतगड आणि सिरसा येथील विमानतळ, नगरोटातील ब्राह्मोस तळ, चंदीगडमधील दारूगोळा केंद्र नष्ट झाल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. पाकिस्तान सोशल मीडियाच्या मदतीने अशा अफवा पसरवत आहे. पाकिस्तान आतापर्यंत भारताचे कोणतेही नुकसान करू शकलेला नाही, असं सोफिया कुरेशी यांनी नमूद केलं आहे. 

हेही वाचा - मोठी बातमी! भारतातील 24 विमानतळ 15 मे पर्यंत बंद

पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार - 

कर्नल सोफिया कुरेशी यांनी म्हटलं आहे की, पाकिस्तानने शुक्रवारी संपूर्ण सीमेवर जोरदार गोळीबार सुरूच ठेवला आहे. ड्रोन आणि लढाऊ विमानांचा वापर करून नागरिक आणि लष्करी इमारतींना लक्ष्य केले जात आहे. याला भारताने प्रत्युत्तर दिले आहे. हा परिस्थिती आणखी चिघळवण्याचा प्रयत्न आहे. भारताने आतापर्यंत पाकिस्तानच्या कृतींना पूर्ण संयमाने योग्य प्रत्युत्तर दिले आहे. 
 


सम्बन्धित सामग्री