अमेरिकन कंपनी अँथ्रोपिकने 'मायथॉस' नावाचे नवीन एआय मॉडेल सादर केल्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) धोक्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. यावर चर्चा करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी बँका आणि भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) यांच्यासोबत बैठक घेतली.
हे मॉडेल बँकिंग आणि वित्तीय प्रणालींमधील डेटासाठी धोकादायक ठरू शकते, असाही दावा करण्यात आला आहे की, या मॉडेलने अनेक प्रमुख ऑपरेटिंग सिस्टीममधील त्रुटी शोधून काढल्या आहेत. हे आणखी धोकादायक ठरू शकते, ज्यामुळे बँका आणि वित्तीय संस्थांकडे असलेल्या निधीमध्ये प्रवेश मिळवणे शक्य होऊ शकते. सरकारलाही या समस्यांबाबत चिंता असून एक बैठक आयोजित करण्यात आली आहे.
आरबीआय आणि बँकांसोबतच्या बैठकांमध्ये अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. निर्मला सीतारामन यांनी अनेक बँकांच्या प्रमुखांसोबत झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत अँथ्रोपिकच्या क्लाउड मायथॉस मॉडेलशी संबंधित संभाव्य सायबरसुरक्षा धोक्यांवर चर्चा केली.
अर्थ मंत्रालयाने कळवले आहे की, निर्मला सीतारामन यांनी क्लाउड मिथोसच्या संभाव्य परिणामांबद्दल इशारा दिला आहे. त्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मायथॉसपासूनचा धोका "अभूतपूर्व आहे आणि त्यासाठी वित्तीय संस्था व बँकांमध्ये उच्च पातळीची दक्षता, पूर्वतयारी आणि वाढीव समन्वयाची आवश्यकता आहे."
क्लाउड मायथॉस काय आहे?
क्लाउड मिथोस हे अँथ्रोपिकचे सर्वात शक्तिशाली एआय मॉडेल आहे. या एआय स्टार्टअपच्या मते, हे मॉडेल सायबरसुरक्षेमध्ये इतके प्रगत आहे की ते सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केले जाऊ शकत नाही. कंपनीचे म्हणणे आहे की, मिथोसने हजारो अशा सायबरसुरक्षा त्रुटी शोधून काढल्या आहेत, ज्या पूर्वी शोधायला कठीण होत्या. यामध्ये प्रमुख ऑपरेटिंग सिस्टीम आणि वेब ब्राउझरमधील २७ वर्षे जुन्या त्रुटींचाही समावेश आहे.
अँथ्रोपिकने म्हटले आहे की, ते उपलब्ध करून देणे म्हणजे लॅपटॉप असलेल्या कोणालाही नवीन हॅकिंग क्षमता देण्यासारखे असेल. याचा अर्थ असा की, मिथोस अशा सुरक्षा त्रुटींचा फायदा घेऊ शकेल ज्यांच्या अस्तित्वाची आपल्याला कधी कल्पनाही नव्हती. आतापर्यंत, अँथ्रोपिकने ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि गुगलसह केवळ ४० निवडक कंपन्यांनाच क्लाउड मिथोसचा ॲक्सेस दिला आहे. मात्र, अहवालानुसार, नोंदणी नसलेल्या वापरकर्त्यांच्या एका गटाने मिथोसचा ॲक्सेस मिळवला असून, त्यांना सायबरसुरक्षेतील त्रुटींचा गैरफायदा घेता येत आहे.