नवी दिल्ली: जागतिक राजकारणाच्या पटावर सध्या भारताच्या तेल आयातीवरून मोठी खडाजंगी पाहायला मिळत आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात नुकत्याच झालेल्या व्यापार कराराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असतानाच, आता रशियन तेलाच्या मुद्द्यावरून वॉशिंग्टन आणि मॉस्को आमनेसामने आले आहेत. अमेरिकेने केलेला एक खळबळजनक दावा आणि रशियाने त्यावर दिलेले सडेतोड प्रत्युत्तर यामुळे आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. भारताच्या एका निर्णयामुळे जागतिक ऊर्जा बाजाराची समीकरणे बदलणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी नुकताच एक मोठा दावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील चर्चेनंतर, भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी थांबवण्यास आणि त्याऐवजी अमेरिकेकडून आयात वाढवण्यास संमती दिल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. अमेरिकेच्या मते, हा व्यापार करार केवळ दोन देशांतील आर्थिक संबंध सुधारणारा नसून रशियावर आर्थिक दबाव निर्माण करणारा एक मोठा मास्टरस्ट्रोक आहे.
मात्र, रशियाने अमेरिकेचा हा दावा सपशेल फेटाळून लावला आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत निवेदन जारी करत म्हटले आहे की, "भारताने आमच्याकडून तेल खरेदी बंद केली आहे, असे मानण्यास सध्या तरी कोणतेही सबळ कारण नाही." रशियाच्या मते, भारत आणि रशियामधील ऊर्जा व्यापार हा केवळ व्यावसायिक नसून तो दोन्ही राष्ट्रांच्या हिताचा आणि जागतिक ऊर्जा बाजारात स्थिरता राखणारा आहे. 'मैत्रीचा हात' आणि 'व्यापाराची गणिते' यात भारत आपल्या राष्ट्रीय हितालाच प्राधान्य देईल, असा विश्वास रशियाने व्यक्त केला आहे.
हेही वाचा: Hydrogen Balloons Blast : 'काळ आला होता पण..' लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा भीषण स्फोट
या संपूर्ण वादात भारताची भूमिका 'मौनं सर्वार्थ साधनम्' अशी राहिली आहे. अमेरिकेच्या दाव्यावर भारताने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, 'रॉयटर्स'च्या ताज्या अहवालानुसार, जानेवारी महिन्यात भारताने रशियाकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीत काही प्रमाणात कपात केल्याचे आकडे समोर आले आहेत. मात्र, ही कपात म्हणजे व्यापार पूर्णपणे थांबवणे नव्हे, तर ते एक धोरणात्मक पाऊल असू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
भारतासाठी ही स्थिती अत्यंत नाजूक आहे. एका बाजूला अमेरिकेसोबतचे तंत्रज्ञान आणि व्यापार क्षेत्रातील वाढते संबंध आहेत, तर दुसऱ्या बाजूला रशियाशी असलेली दशकांपूवीची ऊर्जा सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील भागीदारी आहे. अमेरिकेचा दावा आणि रशियाचा नकार यांच्या कात्रीत अडकलेल्या या तेल व्यापाराचे गूढ आता भारताच्या अधिकृत भूमिकेनंतरच स्पष्ट होईल.
शेवटी, जागतिक राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असते ते फक्त 'राष्ट्रहित'. भारताने रशियन तेलाला खरंच 'बाय-बाय' केले आहे की हा अमेरिकेचा केवळ दबावाचा तंत्राचा भाग आहे, हे येणारा काळच ठरवेल. तूर्तास, या तेल पेचामुळे जागतिक बाजारपेठेत मात्र मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे.
हेही वाचा: Pakistan Youtuber Threatens ICC : 'ICC चे कार्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते...'; पाकिस्तानी यूट्यूबरचे प्रक्षोभक विधान