Saturday, January 24, 2026 02:51:56 AM

Indigo Airlines: पुण्याला जाण्यासाठी नागपूरवरुन विमानाने उड्डाण केलं पण... इंडिगोच्या ढिसाळ कारभारचा प्रवाशाला फटका

पुणे विमानतळावर इंडिगोच्या बेभरवशाच्या नियोजनामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

indigo airlines पुण्याला जाण्यासाठी नागपूरवरुन विमानाने उड्डाण केलं पण इंडिगोच्या ढिसाळ कारभारचा प्रवाशाला फटका

Indigo Airlines:देशातील विमानसेवा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड विस्कळीत झाली आहे. त्यातच पुणे विमानतळावर इंडिगो एरलाइन्सच्या नियोजनात झालेल्या मोठ्या तुटीमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. रात्री उशिरा प्रवासाला निघालेले प्रवासी शेवटी पुण्यात उतरण्याऐवजी हैदराबाद विमानतळावर अडकून पडले, आणि त्यानंतर संतप्त झालेले प्रवासी इंडिगोवरच खापर फोडताना दिसले.

10 पैकी 9 जागांवर इंडिगोची विमानं- गोंधळ वाढवणारी परिस्थिती

पुणे विमानतळावर विमान उभं ठेवण्यासाठी केवळ 10 बे आहेत. मात्र, यापैकी तब्बल 9 बे इंडिगोच्या विमानांनी व्यापल्याने इतर कंपन्यांच्या फ्लाइट्सना जागा मिळालीच नाही. याचा परिणाम थेट देशभरातील कनेक्टिव्हिटीवर झाला.यामुळे इतर विमान कंपन्यांच्या सेवांमध्ये उशिर, रद्दीकरण, आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

नागपूर-पुणे फ्लाइट झाली… नागपूर-हैदराबाद

नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या इंडिगो फ्लाइटने नियोजित वेळेनुसार रात्री 11:40 ला उड्डाण करायचे होते. मात्र, विमान जवळपास दीड तास उशिरा उडाले. त्यानंतर भीषण अघटित घडले. पायलटने अचानक घोषणा केली की पुण्यात लँडिंगची जागा नाही!आणि थेट विमानाला हैदराबादला वळवण्यात आले.

प्रवाशांना एक तास विमानाबाहेरही निघू दिले नाही

हैदराबादला पोहोचल्यानंतरही प्रवाशांना विमानातच थांबवण्यात आले.थकवा, चिडचिड, आणि चिंतेने कंटाळलेले प्रवासी अखेरीस आक्रोश करत हवाला मागू लागले. त्यानंतरच त्यांना टर्मिनलमध्ये प्रवेश देण्यात आला.

प्रवाशांचा संताप

नागपूरहून गेलेले प्रवासीच नव्हे, तर:

  • वाराणसी–पुणे फ्लाइटचे प्रवासी

  • इतर कनेक्टिंग प्रवासी
    हे सर्वही हैदराबादला अडकून पडले आहेत, अशी माहिती प्रवाशांनीच दिली आहे.

काहींनी सोशल मीडियावर इंडिगोच्या व्यवस्थापनाविरोधात नाराजी व्यक्त केली. “पुणे विमानतळावर जागा नाही हे आधीच माहीत असताना आम्हाला उशिरा का उडवले?” असा सवाल प्रवाशांकडून होत आहे.

विमानतळ प्रशासन आणि DGCA काय म्हणतं?

संपूर्ण घटनेनंतर विमानतळ प्रशासनाने परिस्थिती स्थिर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. DGCA कडूनही या प्रकरणाची माहिती घेण्यात येत असून पुढील कारवाईची शक्यता व्यक्त होत आहे.
एअरलाइन कंपन्यांची भारतातील वाढ, पण त्याच वेगाने वाढत नसलेली विमानतळ क्षमता; ही परिस्थिती पुढील काळात अजून गंभीर होऊ नये, यासाठी नियोजन आणि जबाबदारीचे भान आवश्यक आहे.


सम्बन्धित सामग्री