Saturday, May 17, 2025 10:01:40 PM

लाहोरमध्ये भीषण स्फोट; भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढला

लाहोरमध्ये सलग तीन स्फोटांनी खळबळ; परिसरात भीतीचं वातावरण, भारताच्या हवाई कारवाईची पार्श्वभूमी.

लाहोरमध्ये भीषण स्फोट भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढला

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या लाहोर शहरात गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला. माहितीनुसार, लाहोरमध्ये सलग तीन स्फोट झाले असून त्यांचा आवाज तब्बल तीन किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे स्फोट लाहोरच्या गुलमर्ग परिसरात झाले असून, हा भाग लष्करी वसाहतीजवळ आहे. त्यामुळे हा स्फोट केवळ अपघाती होता की जाणूनबुजून घडवून आणलेला कट होता, याबाबत चौकशी सुरू आहे. स्फोटाच्या नंतर पाकिस्तानी पोलीस दलाने संपूर्ण परिसर सील केला असून बचाव आणि मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. स्फोट किती तीव्र होते आणि त्यामध्ये किती जणांचा जीव गेला याबाबत अधिकृत माहिती अजून मिळालेली नाही.

या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. एक दिवस आधीच भारताने पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत जोरदार हवाई कारवाई केली होती. या कारवाईत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे भारतीय मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान दरम्यानचा तणाव वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे.

हेही वाचा: ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये हाहाकार, कराची स्टॉक एक्स्चेंज कोसळले

लाहोरमधील स्फोटांमुळे कराची विमानतळावरील फ्लाइट ऑपरेशन्स तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. लाहोर आणि इतर मोठ्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. स्फोटस्थळाच्या आसपासचे क्षेत्र विमानतळाजवळ असल्यामुळे ही परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

सकाळच्या सुमारास अचानक झालेल्या या स्फोटांनी लाहोर शहर थरारून गेले आहे. नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण आहे. अनेकांनी आपली घरं सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.

या घटनेने आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंता व्यक्त केली जात आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढता तणाव आणि हालचाली पाहता, येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे भारत दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलत आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानमधील अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

लाहोर स्फोटांमागे नेमके कोण आहे, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी हा प्रकार अत्यंत धोकादायक असल्याचे सुरक्षा तज्ज्ञांचे मत आहे. पुढील तपास आणि कारवाईनंतरच या घटनेची खरी माहिती समोर येणार आहे. दरम्यान, पाकिस्तान सरकारने या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून, नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

भारत-पाकिस्तानमधील वाढता संघर्ष आणि लाहोरमधील या स्फोटामुळे दोन्ही देशांमधील तणावाचा थर अधिक वाढला आहे. 


सम्बन्धित सामग्री