जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. काही क्षणांत अनेक कुटुंबांचे विश्व उध्वस्त झाले.आता याच हल्ल्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. पहलगाम हल्ल्यावर आता NIAचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे ज्यात हा कट लष्कर-ए-तोयबा, ISI, लष्करानं रचल्याची माहिती समोर आली आहे. NIAचा हा प्राथमिक अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाकडे सादर करण्यात आला. त्याचबरोबर ह्याप्रकरणी तब्ब्ल 150 जणांची चौकशी केल्याचीही माहिती समोर आली आहे .
नेमकं काय घडलं?
जम्मू-काश्मीरमधील सुंदरतेने नटलेले पहलगाम आता एका भयावह घटनेमुळे चर्चेत आले आहे. 22 एप्रिलला अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन खोऱ्याजवळील टेकड्यांवर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर संपूर्ण भागात भीतीचे सावट पसरले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबार करण्या आधी धर्म विचारला गेला होता असं समोर आलं आहे.
पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा बदला घेण्याचे स्पष्ट निर्देश भारतीय सैन्याला दिले आहेत. त्यांनी सैन्यदलाच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त करत, योग्य वेळी योग्य टार्गेट निवडून कारवाई करावी अशी मुभा तीनही सैन्यदलांना दिली आहे. दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात याव्यात, अशी भूमिका मोदींनी घेतली आहे.
याशिवाय, बारामुल्ला व कुपवाडा जिल्ह्यांतील काही भागांमध्येही नियंत्रण रेषेवर अशाच प्रकारचा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली होती. तसेच, आंतरराष्ट्रीय सीमेवरील परगवाल सेक्टरमध्येही पाकिस्तानी सैन्याने लहान शस्त्रांद्वारे अकारण गोळीबार केला. या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, सीमेवरील सततच्या अशा हालचालींमुळे भारतीय सुरक्षा दल सतर्क झाले असून, कोणत्याही संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत. भारतीय लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, देशाच्या सीमांचे संरक्षण हे सर्वोच्च प्राधान्य असून, अशा कुरघोड्यांना सडेतोड उत्तर देण्यात येईल.