Lok Sabha Adjourned: केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांनी शुक्रवारी लोकसभेत प्रचंड गोंधळ घातला. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज वारंवार विस्कळीत झाले आणि अखेर सभापती संध्या राय यांनी लोकसभेची बैठक 9 मार्च रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब केली.
प्रश्नोत्तराच्या तासात गोंधळ आणि तहकुबी
सभागृहाचे कामकाज सुरू होताच सभापतींनी माजी खासदार डॉ. भगवान दास राठोड यांच्या निधनाची माहिती दिली आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हरदीप सिंग पुरी यांच्या राजीनाम्यासाठी घोषणाबाजी करत अध्यक्षांच्या व्यासपीठासमोर धाव घेतली. या गोंधळातच काँग्रेस खासदार उज्ज्वल रमण सिंह यांनी विचारलेल्या प्रश्नाला आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी उत्तर दिले. मात्र, गोंधळ न थांबल्याने कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि त्यानंतर 9 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आले.
काय आहे वादाचे मूळ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांनंतर हे प्रकरण तापले आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी बुधवारी स्पष्ट केले होते की, त्यांनी अमेरिकन लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनची काही वेळा भेट घेतली होती. मात्र, या भेटीचा एपस्टाईनच्या गुन्ह्यांशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. तरीही विरोधकांनी या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
हेही वाचा - India Passport World Ranking: गुड न्यूज! भारताच्या पासपोर्टची जागतिक क्रमवारीत मोठी सुधारणा, वाचा आता कुठे विनाव्हिसा फिरता येणार?
कामकाजावर परिणाम
सभापती संध्या राय यांनी सदस्यांना शांत राहून कामकाज चालू देण्याचे आवाहन केले, परंतु विरोधी सदस्य आपल्या मागणीवर ठाम राहिले. अवघ्या पाच मिनिटांतच पहिल्यांदा सभागृह तहकूब करावे लागले. दुपारी 12 वाजता पुन्हा कामकाज सुरू झाले, तेव्हा केवळ आवश्यक कागदपत्रे टेबलावर ठेवण्यात आली आणि अवघ्या सहा मिनिटांतच सभागृह पुढील महिन्यापर्यंत तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला.