Thursday, May 22, 2025 05:57:54 PM

Pahalgam terror attack: महाराष्ट्र सरकारकडून विशेष विमानांची व्यवस्था, 183 पर्यटक आज मुंबईत परतणार

पहलगाम मधील दहशतवाद हल्ल्या नंतर सरकारने अडकलेल्या पर्यटकांना परतण्यासाठी विशेष विमानांची सोय केली आहे .

pahalgam terror attack महाराष्ट्र सरकारकडून विशेष विमानांची व्यवस्था 183 पर्यटक आज मुंबईत परतणार

पहलगाम: काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 27 निष्पाप नागरिकांचा जीव गेला असून, यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या अनेक कुटुंबांवर मोठा आघात झाला असून, अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे. काहींनी आपल्या डोळ्यांदेखत पतीवर गोळ्या झेललेल्या भयावह प्रसंगाचा सामना केला आहे. हे दुःख शब्दांत व्यक्त करता न येणारे आहे.

या घटनेनंतर काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक पर्यटक अजूनही तिथे अडकलेले आहेत. त्यांना आपल्या घरी सुखरूप परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेत तातडीने विशेष विमानांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, आज दोन विशेष विमाने महाराष्ट्रातील पर्यटकांना घेऊन मुंबईत दाखल होणार आहेत. एअर इंडियाचे एक विमान 100 पर्यटकांना घेऊन येणार आहे, तर इंडिगोच्या विमानातून 83 पर्यटकांची सुटका करण्यात येणार आहे. एकूण 183 पर्यटक आज सायंकाळपर्यंत मुंबईत परत येणार आहेत.

Pahalgam Terror Attack: "दहशतवादावर मिळून लगाम लावूया"

या विशेष विमानांचा संपूर्ण खर्चाची जबाबदारी राज्य सरकार घेतली असून, केंद्र सरकारकडूनही या प्रकरणात सहकार्य मिळाले आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे स्वतः यासाठी सक्रिय असून, त्यांनी या प्रक्रियेसाठी आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली आहे.

या घटनेनंतर सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. ही घटना फक्त दहशतवाद्यांचा क्रूर चेहरा उघड करणारी नाही, तर देशातील नागरिकांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. आता या प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची गरज अधिकच प्रकर्षाने जाणवत आहे. सरकारने घेतलेली तातडीची पावले कौतुकास्पद असली, तरी अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे.


सम्बन्धित सामग्री