Bihar Politics: भारतीय राजकारणाची प्रयोगशाळा मानल्या जाणाऱ्या बिहारमध्ये अखेर मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला असून, बिहारच्या राजकारणात आता एका नवीन पर्वाची सुरुवात होत आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) धक्कातंत्राचा वापर करत सम्राट चौधरी यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली असून, ते राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या निर्णयामुळे बिहारच्या सत्ता समीकरणात मोठी फेरबदल पाहायला मिळत आहेत.
शेवटची कॅबिनेट बैठक आणि राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द
नितीश कुमार यांनी आज सकाळी 11 वाजता आपल्या मंत्रिमंडळाची अखेरची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी थेट राजभवन गाठून राज्यपाल महोदयांकडे आपला राजीनामा सोपवला. गेल्या अनेक वर्षांपासून बिहारच्या सत्तेची सूत्रे आपल्या हातात ठेवल्यानंतर, नितीश कुमार आता राज्याच्या राजकारणातून बाहेर पडून राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नितीश कुमारांची दिल्लीत एन्ट्री: राज्यसभा सदस्य म्हणून शपथ
नितीश कुमार यांनी केवळ राज्याचे मुख्यमंत्रीपदच सोडले नाही, तर त्यांनी 10 एप्रिल 2026 रोजी नवी दिल्लीत राज्यसभा सदस्य म्हणून शपथही घेतली आहे. उपराष्ट्रपती एस. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना खासदारकीची शपथ दिली. आता नितीश कुमार केंद्रात महत्त्वाची आणि निर्णायक भूमिका बजावणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे जेडीयू (JDU) कार्यकर्त्यांमध्ये सध्या संमिश्र भावना पाहायला मिळत आहेत.
सम्राट चौधरी मुख्यमंत्री होणार
बिहारच्या इतिहासात भाजपला पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपद मिळत असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष आहे. सम्राट चौधरी यांच्या नावाची घोषणा होताच समर्थकांनी जल्लोष केला. विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांना सत्तेवरून हटवण्यासाठी डोक्यावर 'फेटा' बांधला होता आणि शपथ घेतली होती की, जोपर्यंत नितीश कुमारांचे सरकार जात नाही तोपर्यंत हा फेटा उतरवणार नाही. आज त्यांची ही शपथ पूर्ण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हेही वाचा - Sunil Tatkare On Raigad Fort : किल्ले रायगडावर प्री-वेडिंग शूट करणं पडणार महागात; तटकरेंकडून पुरातत्व खात्याला थेट सूचना?
भाजपचे वर्चस्व आणि सत्तेचे नवे समीकरण
विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या NDA च्या बैठकीत केंद्रीय पर्यवेक्षक शिवराज सिंह आणि नितीन नबीन यांच्या उपस्थितीत सम्राट चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मंगळवारी झालेल्या आमदारांच्या बैठकीनंतर आता बिहारमध्ये भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. जेडीयू आणि भाजपच्या युतीमध्ये आता 'मोठा भाऊ' म्हणून भाजप समोर आला आहे. सम्राट चौधरी यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली असून, आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या शपथविधीची अधिकृत वेळ जाहीर होण्याची शक्यता आहे.