नवी दिल्ली: भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या एअर स्ट्राइकमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधान शहबाज शरीफ यांची तात्काळ प्रतिक्रिया आली आणि त्यांनी भारतावर भ्याड हल्ले केल्याचा आरोप केला. पण वस्तुस्थिती अशी आहे की, भारताने दहशतवादाच्या विरोधात कठोर पावले उचलली आहेत आणि यामुळे पाकिस्तानची भीती आणि असहायता स्पष्टपणे दिसत आहे.
शहबाज शरीफ यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले की, भारताने पाकिस्तानी भूमीवर पाच ठिकाणी हल्ला केला. त्यांनी युद्धजन्य कारवाईचे समर्थन करत कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला. पण यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, भारताच्या या निर्णायक पावलांमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जे देश कायम आपली ताकद दाखवत होते, आज तेच ‘भारताने आमच्यावर युद्ध लादलं’ असा कांगावा करत आहेत. म्हणजेच, हेच त्यांचं प्रत्यक्ष कबुलीपत्र आहे की भारत आता अशा ताकदीने उत्तर देतो की शत्रूलाही वेळेआधी भानावर यावं लागतं.
हेही वाचा: एअर स्ट्राईकचा सुवर्ण बाजारावर मोठा परिणाम; जळगावमध्ये सोन्याच्या दरात विक्रमी वाढ
भारतीय लष्कराने अचूक माहितीवरून कारवाई करत पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उडवून दिले. या कारवाईचा उद्देश केवळ आत्मरक्षण नव्हे, तर भारताविरुद्ध सतत कट रचणाऱ्या शक्तींना ठोस इशारा देणं हा होता. या आक्रमक परंतु अचूक कारवाईमुळे पाकिस्तान सरकार आणि लष्करातील अस्वस्थता उघड झाली आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही असेच विधान करून भारतावर आरोप केला की, त्यांनी नागरिकांना लक्ष्य केलं आहे. पण खरं म्हणजे, भारताचे हल्ले दहशतवादी तळांवर होते. जिथून भारताविरुद्ध कट रचले जात होते. पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय मीडियाला या ठिकाणी नेण्याची भाषा केली जात आहे, पण अशा पोकळ विधानांमधून त्यांची गोंधळलेली अवस्था स्पष्ट होते.
पाकिस्तानने आता 48 तासांसाठी आपलं हवाई क्षेत्र बंद केलं आहे, जे त्यांचं भीतीचं दुसरं लक्षण आहे. याचाच अर्थ, भारताची कारवाई प्रभावी ठरली आहे आणि पाकिस्तानला कोणत्या दिशेने उत्तर द्यायचं हे समजेनासं झालं आहे. ते केवळ भावनिक वक्तव्यांवर आणि आंतरराष्ट्रीय सहवेदना गोळा करण्यावर भर देत आहेत.
भारताने गेल्या काही वर्षांत पाकिस्तानला अनेक मुद्द्यांवर ठोस उत्तरं दिली आहेत. मग ते सर्जिकल स्ट्राईक असो, बालाकोट एअर स्ट्राईक, पाक नागरिकांच्या व्हिसा रद्दीकरणाचा निर्णय असो किंवा सिंधू जल कराराचा आढावा. हे सर्व निर्णय भारताच्या धोरणात्मक दृढतेचे आणि राष्ट्रीय सुरक्षेवरील कटिबद्धतेचे स्पष्ट चिन्ह आहेत.
पाकिस्तान जेव्हा 'आम्ही प्रत्युत्तर देऊ' अशा भाषेत बोलतो, तेव्हा त्यांच्या शब्दांमध्ये आत्मविश्वासापेक्षा भीती अधिक जाणवते. कारण जेव्हा एखादा देश खरोखरच शक्तिशाली असतो, तेव्हा तो गोंधळ घालत नाही. तो कृती करतो. आणि भारत आज कृती करत आहे.