नवी दिल्ली: भारतीय हद्दीत शांतता भंग करण्याचा पाकिस्तानचा डाव पुन्हा एकदा उघड झाला आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास जम्मू विमानतळावर रॉकेट हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र भारतीय सैन्याने सतर्कता राखत पाकड्यांचे हे सर्व रॉकेट हवेतच उध्वस्त केले. एस-400 सुदर्शन चक्र प्रणालीच्या साहाय्याने हा डाव हाणून पाडण्यात आला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
गेल्या काही दिवसांपासून सीमेलगत कुरापती सुरूच असून यावेळी थेट नागरी विमानतळाचं लक्ष्य केलं गेलं होतं. मध्यरात्री झालेल्या स्फोटाच्या आवाजाने जम्मू परिसर हादरून गेला. काही मिनिटांत संपूर्ण परिसरात ब्लॅक आऊट करण्यात आलं आणि सुरक्षाबलांनी ताबडतोब कारवाई सुरू केली. विमानतळावरून सुमारे तीन किमी अंतरावर हे रॉकेट निष्क्रिय करण्यात आले.
संवेदनशील ठिकाणी झालेल्या या हल्ल्याचा तपास सध्या एनआयए आणि लष्करी गुप्तचर विभाग करत आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे रॉकेट नियंत्रण रेषेजवळून दागवण्यात आलं होतं. एस-400 सारख्या अत्याधुनिक प्रणालीमुळे मोठा अनर्थ टळला आहे. या हल्ल्यामुळे जम्मूमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
हल्ल्यानंतर जम्मूसोबतच पठाणकोट आणि अखनूर येथेही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत देखील संशयित हालचाली दिसून आल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण सीमावर्ती भागात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडून या हल्ल्याची गंभीर दखल घेण्यात आली असून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा अशा हल्ल्यांची शक्यता लक्षात घेता लष्कर आणि हवाई दल सज्ज अवस्थेत आहेत.
भारताने शांततेचा मार्ग नेहमीच स्वीकारलेला आहे, मात्र अशा कुरापतींना कडक उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असं स्पष्ट वक्तव्य लष्करी अधिकाऱ्यांनी केलं आहे. जम्मूतील नागरिकांनी शांतता राखावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू विमानतळावरील सर्व उड्डाणे काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. मात्र सध्या स्थिती नियंत्रणात असून विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू आहे आणि अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.