नवी दिल्ली : आंबेडकर जयंतीदिनी 14 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणाला भेट देणार आहेत. ते हिसारला जाणार आहेत आणि सकाळी 10:15 वाजता हिसार ते अयोध्या व्यावसायिक उड्डाणाला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसेच हिसार विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी करणार आहेत.
त्यानंतर दुपारी 12:30 वाजता, ते यमुनानगर येथे विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.विमान प्रवास सर्वांसाठी सुरक्षित, परवडणारा आणि सुलभ बनवण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरून पंतप्रधान हिसारमधील महाराजा अग्रसेन विमानतळाच्या 410 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी करणार आहेत. त्यात एक अत्याधुनिक प्रवासी टर्मिनल, एक कार्गो टर्मिनल आणि एक एटीसी इमारत आहे. हिसार ते अयोध्या या पहिल्या विमान उड्डाणालाही ते हिरवा झेंडा दाखवणार आहेत. हिसार ते अयोध्या (आठवड्यातून दोनदा) नियोजित उड्डाणे, जम्मू, अहमदाबाद, जयपूर आणि चंदीगडसाठी आठवड्यातून तीन उड्डाणे हा विकास हरियाणाच्या विमान वाहतूक कनेक्टिव्हिटीमध्ये एक महत्त्वपूर्ण झेप ठरणार आहे. या प्रदेशातील वीज निर्मिती संबंधी पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी आणि शेवटच्या गावापर्यंत वीज पोहोचवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, पंतप्रधान यमुनानगर येथे दीनबंधू छोटू राम औष्णिक वीज प्रकल्पाच्या 800 मेगावॅट क्षमतेच्या आधुनिक औष्णिक वीज प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. 233 एकर परिसरातील सुमारे 8,470 कोटी रुपये खर्चाचे हे एकक हरियाणाच्या ऊर्जा स्वयंपूर्णतेला लक्षणीयरीत्या चालना देईल आणि संपूर्ण राज्यात अखंड वीज पुरवठा करेल.
हेही वाचा : अन्नपाण्यासाठी वन्यप्राण्यांची मानवी वस्त्यांकडे धाव
गोबरधन म्हणजेच गॅल्वनाइजिंग ऑरगॅनिक बायो-अॅग्रो रिसोर्सेस धनचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान यमुनानगरमधील मुकरबपूर येथे एका कॉम्प्रेस्ड बायोगॅस संयंत्राची पायाभरणी करणार आहेत. या संयंत्राची वार्षिक उत्पादन क्षमता 2,600 मेट्रिक टन असेल आणि स्वच्छ ऊर्जा उत्पादन आणि पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्याबरोबरच सेंद्रिय कचऱ्याच्या प्रभावी व्यवस्थापनातही ते मदत करेल. भारतमाला परियोजनेअंतर्गत सुमारे 1,070 कोटी रुपये खर्चाच्या 14.4 किमी रेवाडी बायपास प्रकल्पाचे उद्घाटन देखील पंतप्रधान करतील. यामुळे रेवाडी शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल, दिल्ली-नारनौल प्रवासाचा वेळ सुमारे एक तासाने कमी होईल आणि या प्रदेशातील आर्थिक आणि सामाजिक घडामोडींना चालना मिळेल.