जर्मनी: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जर्मनी दौऱ्यात पाकिस्तानवर अप्रत्यक्ष निशाणा साधत मोठे वक्तव्य केले. “भारताचे सर्व शेजारी देश चांगले आहेत, फक्त एकच समस्या आहे,” असे म्हणत त्यांनी पाकिस्तानचा उल्लेख केला. पहलगाम हल्ल्याचा निषेध करताना त्यांनी “ऑपरेशन सिंदूर” चा उल्लेख करत भारताच्या लष्करी ताकदीत मोठी वाढ झाल्याचे सांगितले.
बर्लिनमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना राजनाथ सिंग म्हणाले की, भारताने कधीही कोणत्याही देशावर आक्रमण केले नाही. मात्र, जर एखाद्या शेजारी देशाने भारताशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला सोडले जाणार नाही. भारत आता पूर्वीसारखा राहिलेला नाही आणि जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा अधिक मजबूत झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बर्लिन येथे बोलताना त्यांनी भारत आणि जर्मनी यांच्यातील संबंध केवळ लोकशाहीपुरते मर्यादित नसल्याचे सांगितले. येथे राहणारा भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधील मजबूत दुवा असल्याचे त्यांनी नमूद केले. “तुमची प्रतिष्ठा वाढली तर भारताची प्रतिष्ठाही वाढेल,” असेही ते म्हणाले.
हेही वाचा: Yeola Water Shortage : येवला तालुक्यात भीषण पाणीटंचाई! 23 गावे अन् 8 वाड्या टँकरच्या भरवशावर
राजनाथ सिंग यांनी भारतातील स्टार्टअप क्षेत्राचाही उल्लेख केला. भारत लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्टअप व्यवस्था बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच महिलांना भारतात 33 टक्के आरक्षण मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जर्मनीच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, जर्मनीला जागतिक समुदायात विशेष मान आणि विश्वासार्हता आहे. या यशामध्ये जर्मनीतील स्थानिक नागरिकांसोबतच भारतीय वंशाच्या लोकांचाही मोठा वाटा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
राजनाथ सिंग सध्या जर्मनीच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचा उद्देश भारत-जर्मनी संरक्षण औद्योगिक कराराला अंतिम स्वरूप देणे हा आहे. त्यांनी जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस आणि इतर वरिष्ठ नेत्यांसोबतही चर्चा केली. सात वर्षांनंतर भारताच्या संरक्षण मंत्र्यांचा हा जर्मनी दौरा होत आहे.
हेही वाचा: Chat GPT ला 'हे' वैयक्तिक प्रश्न चुकूनही विचारू नका, उत्तराऐवजी मिळू शकतो धोका; पाहा संपूर्ण यादी