अलाहाबाद: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आणि पर्यटकांच्या क्रूर हत्येमुळे संपूर्ण भारतात संताप व्यक्त होत आहे. संपूर्ण देश दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या पाकिस्तानवर कारवाईची मागणी करत आहे. तथापि, काँग्रेस नेते रॉबर्ट वाड्रा यांनी या हल्ल्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी या दहशतवादी हल्ल्याचे कारण भारतातील मुस्लिमांवरील अत्याचार असल्याचे म्हटले होते. या विधानाबाबत वाड्रा यांच्याविरुद्ध चौकशीसाठी याचिका दाखल करण्यात आली आहे, ज्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे लखनौ खंडपीठ शुक्रवारी सुनावणी करणार आहे.
काय म्हणाले होते रॉबर्ट वाड्रा?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलं होतं की, 'मला खूप वाईट वाटत आहे आणि या दहशतवादी कृत्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल माझी तीव्र संवेदना आहे. आपल्या देशात, आपण पाहतो की हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलत आहे. त्यामुळे अल्पसंख्याकांना अस्वस्थ वाटत आहे. जर तुम्ही या दहशतवादी कृत्याचे विश्लेषण केले तर, ते (दहशतवादी) लोकांना धर्म का विचारत असतील? कारण आपल्या देशात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट निर्माण झाली आहे. यामुळे अशा संघटनांना असे वाटेल की, हिंदू सर्व मुस्लिमांसाठी समस्या निर्माण करत आहेत. एखाद्या व्यक्तीचा धर्म पाहून हत्या करणे, हा पंतप्रधानांना संदेश आहे. कारण देशातील मुस्लिमांना कमकुवत वाटत आहे.'
हेही वाचा - ''देशात मुस्लिमांविरुद्ध भेदभाव वाढत आहे म्हणून...''; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर रॉबर्ट वाड्रा यांचे वादग्रस्त वक्तव्य
हिंदू फ्रंट फॉर जस्टिस दाखल केली याचिका -
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरील रॉबर्ट वाड्रा यांच्या वादग्रस्त विधानाविरुद्ध हिंदू फ्रंट फॉर जस्टिस आणि इतर संघटनांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात केंद्र सरकारला एसआयटी स्थापन करून रॉबर्ट वढेरा यांच्याविरुद्ध चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याशिवाय, याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला वाड्रा यांच्याविरुद्ध बीएनएसच्या तरतुदींनुसार कारवाई करण्याचे आदेश देण्याची विनंती केली आहे.
हेही वाचा - रॉबर्ट वाड्रा यांना ED कडून पुन्हा समन्स
पहलगाम दहशतवादी हल्ला -
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी एक मोठा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी बैसरण व्हॅलीमध्ये पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना लक्ष्य केलं आणि त्यांना धर्माची विचारणा केल्यानंतर गोळ्या घालण्यात आल्या. पर्यटक कोणत्या जातीचे आहेत, याचा तपास करण्यासाठी दहशतवाद्यांनी त्यांना पॅन्ट काढण्यास भाग पाडले.