Saturday, June 06, 2026 10:49:22 AM

Cyber Sakhi Initiative: आता गावागावात तयार होणार 'सायबर सखी'! रिलायन्स फाउंडेशचा 'हा' नवा उपक्रम नेमका काय आहे?

‘सायबर सखी’ मॉडेलद्वारे 10 लाख महिलांना सुरक्षित डिजिटल वापरासाठी सक्षम करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न सुरू झाला आहे.

cyber sakhi initiative आता गावागावात तयार होणार सायबर सखी रिलायन्स फाउंडेशचा हा नवा उपक्रम नेमका काय आहे

नवी दिल्ली: रिलायन्स फाउंडेशन आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग यांनी संयुक्तपणे ग्रामीण भागातील महिलांना डिजिटल जगात सुरक्षित बनवण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. ‘e-SafeHER’ असे या मोहिमेचे नाव असून, पुढील तीन वर्षांत सुमारे 10 लाख महिलांना सायबर सुरक्षेबाबत जागरूक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे गावागावांत ‘सायबर सखी’ तयार करण्यावर भर दिला जाणार आहे.

माध्यमांच्या माहितीनुसार, हा उपक्रम इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या ‘इन्फॉर्मेशन सिक्युरिटी एज्युकेशन अँड अवेअरनेस’ कार्यक्रमांतर्गत राबवला जाणार आहे. यामध्ये सी-डॅक प्रशिक्षणासाठी आवश्यक साहित्य तयार करून ते स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध करून देईल, तर रिलायन्स फाउंडेशन हा कार्यक्रम प्रत्यक्ष पातळीवर राबवेल. या मोहिमेची सुरुवात मध्य प्रदेश आणि ओडिशा येथून होणार असून, पुढे ती संपूर्ण देशभर विस्तारली जाईल.

प्रशिक्षणासाठी ऑडिओ-व्हिज्युअल आणि बहुभाषिक मॉड्यूल्सचा वापर करण्यात येणार आहे, ज्यामुळे महिलांना सहज आणि प्रभावीपणे शिकता येईल. ग्रामीण भागात स्मार्टफोन, ऑनलाइन व्यवहार आणि डिजिटल सेवांचा वापर झपाट्याने वाढत असताना, सायबर फसवणूक, डेटा चोरी आणि ऑनलाइन हल्ल्यांचा धोका देखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महिलांना सुरक्षित डिजिटल वापराचे प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक बनले आहे.

हेही वाचा: Crime News : बहिणीचा संशयास्पद मृत्यू, अंत्यसंस्काराला सर्वांची पाठ, 5 दिवस मृतदेह घरातच; अखेर बाथरूममध्ये अग्नीडाग

या उपक्रमाची खासियत म्हणजे त्याचा समुदाय आधारित (कम्युनिटी-ड्रिव्हन) दृष्टिकोन. प्रशिक्षण घेतलेल्या महिला स्वतः ‘सायबर सखी’ बनून त्यांच्या परिसरात इतर महिलांना मार्गदर्शन करतील. त्यामुळे नव्या यंत्रणेची गरज न पडता हा उपक्रम मोठ्या प्रमाणात प्रभावीपणे विस्तारता येईल.

या उपक्रमामागील दृष्टीकोनाबाबत ईशा अंबानी यांनी सांगितले की, ग्रामीण भारतातील महिला वेगाने डिजिटल माध्यमांशी जोडल्या जात आहेत. त्यामुळे त्यांना केवळ इंटरनेटचा वापर शिकवणे पुरेसे नाही, तर तो सुरक्षितपणे कसा वापरायचा हे शिकवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

एकूणच, ‘e-SafeHER’ हा उपक्रम महिलांना डिजिटलदृष्ट्या सक्षम, आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासी बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे. या माध्यमातून महिलांना सायबर सुरक्षेचे ज्ञान मिळून त्या डिजिटल जगाचा अधिक सुरक्षित आणि प्रभावीपणे उपयोग करू शकतील. 

हेही वाचा: PF Balance Check: तुमच्या पगारातून कापलेला PF खरंच खात्यात जमा होतोय का? 5 मिनिटांत घरबसल्या करा खात्री


सम्बन्धित सामग्री