Shubhanshu Shukla: भारताचे धाडसी सुपुत्र आणि भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना शांतताकाळातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार 'अशोक चक्र' जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील (ISS) ऐतिहासिक मोहिमेदरम्यान अत्यंत कठीण परिस्थितीत दाखवलेले धैर्य आणि अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना हा बहुमान देण्यात येणार आहे.
राकेश शर्मांनंतरचा मोठा इतिहास
विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे शुभांशु शुक्ला हे दुसरे भारतीय ठरले आहेत. 25 जून 2025 रोजी त्यांनी 'एक्सिओम-4' (Axiom-4) मोहिमेतंर्गत तीन सहकाऱ्यांसह अंतराळाकडे झेप घेतली होती. सुमारे 20 दिवस अवकाशात वास्तव्य केल्यानंतर 14 जुलै रोजी ते सुखरूप पृथ्वीवर परतले. या मोहिमेने जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली आहे.
हेही वाचा - Gallantry Medals : भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीविरोधात लढणाऱ्या 'या' 31 CBI अधिकाऱ्यांचा देशपातळीवर गौरव; वाचा संपूर्ण यादी
संकटातही डगमगले नाहीत; अवकाशात 60 प्रयोग यशस्वी
अंतराळातील वातावरण मानवी शरीरासाठी अत्यंत आव्हानात्मक असते. या मोहिमेदरम्यान शुक्ला यांनी अनेक शारीरिक आणि मानसिक त्रासांचा सामना केला. तीव्र डोकेदुखी, शरीराला पेटके (Cramps) येणे, थकवा आणि अस्वस्थता अशा त्रासांकडे दुर्लक्ष करत त्यांनी आपले काम सुरू ठेवले. मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये राहून त्यांनी 60 हून अधिक क्लिष्ट प्रयोग केले. यामध्ये प्रगत साहित्य विज्ञान, न्यूरोसायन्स आणि जैवसंशोधन अशा महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश होता. पृथ्वीपासून हजारो मैल दूर, तंत्रज्ञानाच्या मर्यादा आणि आरोग्याची प्रतिकूल स्थिती असतानाही त्यांनी अत्यंत शांतचित्ताने आपली जबाबदारी पार पाडली.
शौर्य पुरस्काराची मोहोर
अंतराळात केवळ वास्तव्य न करता, संशोधनासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या शुक्ला यांच्या या शौर्याची दखल भारत सरकारने घेतली आहे. कठीण प्रसंगातही ढळू न देणारा संयम आणि प्रबळ इच्छाशक्ती यामुळे त्यांच्या नावाची शिफारस अशोक चक्रासाठी करण्यात आली होती. लवकरच एका विशेष सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान केला जाईल.