CM Joseph Vijay: तामिळनाडूच्या राजकारणात प्रस्थापित डीएमके (DMK) आणि एआयएडीएमके (AIADMK) या बलाढ्य शक्तींना धूळ चारल्यानंतर, आता नवे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी सत्तेची सूत्रे हातात घेताच आपला अंदाज स्पष्ट केला आहे. काँग्रेस आणि इतर मित्रपक्षांच्या कुबड्यांवर सरकार उभे असले तरी, प्रशासनावर मात्र केवळ आपलेच वर्चस्व असेल, असे संकेत देत विजय यांनी मित्रपक्षांना मोठा धक्का दिला आहे.
राहुल गांधींच्या उपस्थितीत 'पॉवर' गेम
विशेष म्हणजे, या सोहळ्याला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते. त्यांच्याच समोर विजय यांनी जाहीर केले की, "तामिळनाडूमध्ये आता सत्तेचे दुसरे कोणतेही 'पॉवर सेंटर' नसेल. सत्तेचे एकमेव केंद्र म्हणजे फक्त मी!" विजय यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, मित्रपक्षांवर वर्चस्व राखण्याचा हा त्यांचा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
दबावाला थारा नाही: सरकार चालवताना कोणत्याही सहकारी पक्षाचा किंवा बाह्य शक्तीचा दबाव सहन केला जाणार नाही, असे विजय यांनी ठणकावून सांगितले. स्वतःला तामिळनाडूचा 'थम्बी' (धाकटा भाऊ) म्हणवून घेत, त्यांनी राज्यातील जनतेशी भावनिक नाते जोडले आहे.
चुकीच्या कामांना 'नो एन्ट्री': राज्यात काहीही चुकीचे घडू देणार नाही आणि कोणी तसा प्रयत्न केला तर गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी विरोधकांसोबतच स्वकीयांनाही दिला आहे.
हेही वाचा - Tamil Nadu Politics: तामिळनाडूत राजकीय भूकंप! अण्णा द्रमुक फुटणार? कोण होणार सत्तेचा खरा वाटेकरी?
प्रस्थापितांच्या राजकारणाला पूर्णविराम
गेल्या अनेक दशकांपासून तामिळनाडूची सत्ता दोनच पक्षांत फिरत होती. मात्र, 108 जागा जिंकून 'टीव्हीके'ने (TVK) इतिहास घडवला आहे. सर्वाधिक जागा जिंकल्याचा आत्मविश्वास विजय यांच्या पहिल्याच भाषणातून दिसून आला. "राज्याचा विकास हाच एकमेव अजेंडा असेल आणि त्यासाठी कडक शिस्त पाळली जाईल," असेही त्यांनी स्पष्ट केले. तामिळनाडूच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या पहिल्याच कृतीतून हे स्पष्ट केले आहे की, ते केवळ नावाचे मुख्यमंत्री नसून सत्तेची सर्व सूत्रे स्वतःकडेच ठेवणार आहेत. आता या 'एकहाती' सत्तेच्या भूमिकेवर मित्रपक्ष काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.