Monday, March 09, 2026 07:40:44 AM

Delhi Terror Attack : लाल किल्ल्याजवळील हल्ल्यामागे पाकिस्तानमधील 'या' दहशतवादी संघटनेचा हात; संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून धक्कादायक खुलासा

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 1267 निर्बंध समितीने तयार केलेल्या 37 व्या अहवालात या संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

delhi terror attack  लाल किल्ल्याजवळील हल्ल्यामागे पाकिस्तानमधील या दहशतवादी संघटनेचा हात संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून धक्कादायक खुलासा

Delhi Terror Attack : दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार बॉम्बस्फोटामागे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद'चा (जेईएम) थेट संबंध असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या (UN) ताज्या अहवालात उघड झाले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 1267 निर्बंध समितीने तयार केलेल्या 37 व्या अहवालात या संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली असून, यामुळे सीमेपलीकडील दहशतवादाचा प्रश्न पुन्हा एकदा जागतिक पटलावर चर्चेत आला आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या विश्लेषणात्मक पथकाचा अहवाल
संयुक्त राष्ट्रांच्या विश्लेषणात्मक समर्थन आणि निर्बंध देखरेख पथकाने दिलेल्या माहितीनुसार, 10 नोव्हेंबर 2025 रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली होती. या हल्ल्यात 15 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. एका सदस्य देशाने दिलेल्या माहितीच्या आधारे संयुक्त राष्ट्रांनी हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. पाकिस्तानने यापूर्वी जैश आणि लष्कर-ए-तैयबा यांसारख्या संघटना निष्क्रिय असल्याचा दावा केला होता, मात्र या अहवालाने पाकिस्तानचा हा खोटा दावा खोडून काढला आहे.

मसूद अझहरची 'जमात-उल-मुमिनत' ही नवी चाल
दहशतवादी कारवायांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या मसूद अझहरने 8 ऑक्टोबर रोजी एका नवीन महिला शाखेची घोषणा केली आहे. 'जमात-उल-मुमिनत' असे या नवीन शाखेचे नाव असून, ही संघटना अद्याप संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिबंधित यादीत समाविष्ट नाही. मात्र, या संघटनेच्या माध्यमातून दहशतवादी कारवायांना आर्थिक आणि मानसिक पाठबळ दिले जात असल्याचा गंभीर आरोप अहवालात करण्यात आला आहे. यामुळे भविष्यातील दहशतवादी कारवाऱ्यांचे स्वरूप अधिक जटिल होण्याची भीती व्यक्त होत आहे.

हेही वाचा - Udit Narayan: उदित नारायण यांच्या अडचणीत वाढ; पहिल्या पत्नीचा गंभीर आरोप; म्हणाल्या, "संमतीशिवाय काढलं गर्भाशय"

पहलगाम हल्ला आणि लष्करची 'प्रॉक्सी' संघटना
या अहवालात केवळ लाल किल्ल्यावरील हल्ल्याचाच नाही, तर एप्रिल 2025 मध्ये काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. या हल्ल्यात 26 नागरिकांचा बळी गेला होता. हा हल्ला 'द रेझिस्टन्स फ्रंट' (TRF) या संघटनेने घडवून आणला होता, जी लष्कर-ए-तैयबाचीच एक 'प्रॉक्सी' (छुप्या पद्धतीने काम करणारी) संघटना मानली जाते. भारताने मे महिन्यात पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या कारवाईचा संदर्भही या अहवालाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरला आहे.

सदस्य देशांमध्ये मतभेद; तरीही जैशचा धोका कायम
जैश-ए-मोहम्मदच्या सध्याच्या स्थितीबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर मतभेद पाहायला मिळत आहेत. काही देशांच्या मते ही संघटना आजही पूर्णपणे सक्रिय आहे, तर काही देश ही संघटना आता 'निष्क्रिय' झाल्याचा दावा करत आहेत. मात्र, भारताने सातत्याने जैशच्या सक्रियतेचे पुरावे जगासमोर मांडले आहेत. 28 जुलै 2025 रोजी तीन संशयित दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्यानंतर या संघटनांचे पाळेमुळे आजही घट्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 


सम्बन्धित सामग्री