इराणी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर काही दिवस ठप्प झालेल्या उड्डाण सेवांना अखेर दिलासा मिळाला असून दुबई आणि अबुधाबीहून भारताकडे जाणाऱ्या विमानसेवा पुन्हा सुरू झाल्या आहेत. संयुक्त अरब अमिरातमध्ये अडकलेल्या हजारो भारतीयांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरली. सोमवारी रात्री दुबईहून निघालेली अनेक विमाने दिल्ली, मुंबई आणि बंगळूर येथे सुखरूप उतरल्याचे वृत्त आहे.
अमेरिका-इस्त्रायलच्या इराणवरील कारवाईनंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत इराणने आखाती देशांकडे प्रत्युत्तरात्मक हल्ले केल्याने मध्यपूर्वेतील हवाई क्षेत्रात मोठा अडथळा निर्माण झाला होता. परिणामी अनेक देशांनी हवाई मार्ग तात्पुरते बंद केले आणि शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली. दुबई एअरपोर्ट्सने आंशिक स्वरूपात सेवा पुन्हा सुरू केल्याची अधिकृत घोषणा केली असून, प्रवाशांनी त्यांच्या एअरलाईनकडून पुष्टी झाल्याशिवाय विमानतळावर जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
एमिरेट्स, फ्लायदुबई आणि एतिहाद एअरवेज यांनी मर्यादित उड्डाणे सुरू करण्याची योजना जाहीर केली आहे. आधीच्या आरक्षण असलेल्या प्रवाशांना प्राधान्य दिले जात आहे. एअर इंडिया एक्सप्रेस ने 3 मार्चपासून मस्कत मार्गे दिल्ली, कोची, कोझिकोड, मंगळुरू, मुंबई आणि तिरुचिरापल्ली यांच्याशी पुन्हा संपर्क सुरू करण्याची घोषणा केली आहे. तसेच ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म EaseMyTrip ने फुजैराहहून दिल्ली आणि मुंबईकडे विशेष चार्टर फ्लाइट्सची सोय जाहीर केली आहे.
हेही वाचा: Middle East War: इराण-इस्रायल युद्धज्वराचा चटका भारताच्या उंबरठ्याला; ओमानमधील जहाजावरील हल्ल्यात खलाशाचा मृत्यू
भारतीय नागरी उड्डाण मंत्रालयाने ही मदतकार्य तीव्र केले असून निर्बंधित हवाई क्षेत्र टाळून पर्यायी मार्गांद्वारे लांब पल्ल्याच्या उड्डाणांचे पुनरुज्जीवन सुरू असल्याचे सांगितले आहे. इंडिगोने 3 मार्च रोजी जेद्दाहहून भारतात 10 विशेष मदत उड्डाणे (Relief Flights) चालवण्याची योजना आखली आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार, प्रादेशिक संकटामुळे सोमवारी 357 उड्डाणे रद्द करण्यात आली होती, मात्र हेल्पलाईन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे 559 प्रवासी तक्रारी निकाली काढण्यात आल्या.
दरम्यान, दुबईहून बंगळूरकडे निघालेल्या एमिरेट्सच्या EK568 या विमानातील वातावरणात दिलासा आणि आनंदाचे मिश्र स्वर उमटले. विमानातील कर्मचाऱ्यांनी उड्डाण सुरू झाल्याची घोषणा करताच प्रवाशांनी टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त केला. “उड्डाणे पुन्हा सुरू केल्याबद्दल UAE प्रशासनाचे आभार. आम्ही बंगळूरकडे रवाना होत आहोत आणि ही सुरुवातीच्या उड्डाणांपैकी एक आहे,” असे एका प्रवाशाने सांगितले.
सध्यातरी उड्डाणे टप्प्याटप्प्याने पूर्ववत होत असली तरी परिस्थिती पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात. मध्यपूर्वेतील तणावाचे सावट कायम असताना, भारतीय प्रवाशांच्या सुरक्षित परतीसाठी प्रशासन आणि एअरलाईन्स सतत प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: EPFO Interest Rate: ईपीएफओचा मोठा निर्णय! 2025-26 साठी PF व्याजदर 8.25 टक्केच; कर्मचाऱ्यांना काय फायदा?