Sanjay Raut Reaction on Bihar Election: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या सुरुवातीच्या कलांवरून शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी अत्यंत खोचक प्रतिक्रिया दिली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप, जद (यू) आणि लोजप (रामविलास) या पक्षांच्या एनडीएला (NDA) स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे, तर महागठबंधनला सपशेल अपयश मिळत आहे. एनडीए जवळपास 191 जागांवर आघाडीवर आहे.
संजय राऊत यांचा 'महाराष्ट्र पॅटर्न'चा उल्लेख
महागठबंधनला सुरुवातीच्या कलांनुसार 50 जागांचा आकडाही गाठता आलेला नाही, तर काँग्रेसने दुहेरी (Double Digit) संख्याही गाठलेली नाही. महाआघाडीच्या या अपयशावर संजय राऊत यांनी 'एक्स' प्लॅटफॉर्मवर भाष्य केले आहे.
राऊत यांचा थेट हल्ला: संजय राऊत आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, "बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आणि भाजप यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते! एकदम महाराष्ट्र पॅटर्न!"
हेही वाचा - Bihar Assembly Election 2025: NDAची मजबूत आघाडी कायम; चिराग पासवान ठरले निवडणुकीचे स्टार
'त्यांना 50 च्या आत संपवले'
महागठबंधनच्या अपयशावर बोट ठेवत संजय राऊत पुढे म्हणाले, "जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती, त्यांना 50 च्या आत संपवले!"
राहुल गांधींनी यापूर्वीच महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये मतचोरी झाल्याचे आरोप केले आहेत. त्यातच आता संजय राऊत यांनी बिहारच्या निकालाला 'महाराष्ट्र पॅटर्न' म्हणत, भाजप आणि निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
हेही वाचा - Bihar Assembly Election 2025 : 'बिहारने अराजकता नाकारली; पुढचे लक्ष्य बंगाल'; NDA च्या आघाडीवर गिरिराज सिंह यांचे वक्तव्य