High-Speed Railway Corridors: देशातील पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वे क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना सात नवीन हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा केली असून, यामध्ये महाराष्ट्र आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या मार्गांवर विशेष भर देण्यात आला आहे.
कनेक्टिव्हिटी आणि विकासाचा नवा रोडमॅप
अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, हे नवीन सात कॉरिडॉर केवळ प्रवासाचा वेग वाढवणार नाहीत, तर प्रमुख आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्रांना एकमेकांशी जोडतील. यामुळे उद्योग आणि पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. या प्रकल्पांमुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी लागणारा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल आणि पर्यावरणाच्या दृष्टीने 'कार्बन फूटप्रिंट' कमी करण्यास मदत होईल.
हे आहेत सात नवीन कॉरिडॉर
मुंबई-पुणे: या दोन महत्त्वाच्या शहरांमधील अंतर काही मिनिटांत कापले जाईल.
पुणे-हैदराबाद: महाराष्ट्र आणि तेलंगणामधील व्यापार वृद्धीसाठी हा मार्ग कणा ठरेल.
हैदराबाद-बेंगळुरू: आयटी हबना जोडणारा जलद मार्ग.
दिल्ली-वाराणसी: राजधानीला धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्राशी जोडणार.
वाराणसी-सिलीगुडी: उत्तर आणि ईशान्य भारताला जोडणारा दुवा.
हैदराबाद-चेन्नई आणि चेन्नई-बेंगळुरू: दक्षिण भारतातील प्रमुख शहरांमध्ये वेगवान दळणवळण.
हेही वाचा - Nirmala Sitharaman: कांजीवरम सिल्क, जांभळा रंग; निर्मला सीतारमण यांनी परिधान केलेली साडी का आहे खास?
आर्थिक क्रांतीची अपेक्षा
या घोषणेमुळे मुंबई ते हैदराबाद या पट्ट्यातील विकासाला 'हाय-स्पीड' गती मिळणार आहे. हाय-स्पीड रेल्वेच्या विस्तारामुळे केवळ प्रवास सुखकर होणार नाही, तर या मार्गालगत नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. भारताचे रेल्वे नेटवर्क आधुनिक करण्याच्या दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे.