नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. नागरिकांकडून आता या हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुतेक पर्यटक होते. आता, या दहशतवादी हल्ल्याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पहिले विधान समोर आले आहे. या दहशतवादी हल्ल्याला योग्य उत्तर दिले जाईल, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - 'देशात मुस्लिमांविरुद्ध भेदभाव वाढत आहे म्हणून...'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर रॉबर्ट वाड्रा यांचे वादग्रस्त वक्तव्य
सरकार आवश्यक ते सर्व पाऊल उचलेल - राजनाथ सिंह
दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, 'आपण अनेक निष्पाप लोकांचे प्राण गमावले आहेत. मी मृतांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या संवेदना व्यक्त करतो. भारताचे दहशतवादाबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण आहे. मी देशवासीयांना खात्री देऊ इच्छितो की सरकार आवश्यक ते सर्व पाऊल उचलेल. या दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांसोबतच, त्यामागे लपलेल्या लोकांनाही पकडले जाईल. मी देशाला खात्री देऊ इच्छितो की योग्य आणि स्पष्ट उत्तर दिले जाईल.'
हेही वाचा - Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना राज्य सरकार देणार 10 लाख रुपये नुकसानभरपाई
विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यात आले -
पहलगाममधील दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात एका विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यात आले आहे, असे राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. या हल्ल्यात आपल्या देशाने अनेक निष्पाप नागरिकांना गमावले आहे. या अत्यंत अमानवी कृत्याने आपल्या सर्वांना खोल दुःख आणि वेदनेत बुडवले आहे. सर्वप्रथम, ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे अशा सर्व कुटुंबांबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. या दुःखद वेळी, मी देवाकडे मृतांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतो, असंही राजनाथ सिंह यांनी यावेळी म्हटलं.