मुंबई : राज्याच्या विधान परिषद निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या काही तासांत नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. महायुतीतील घटक पक्ष भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस आणखी एक अतिरिक्त उमेदवार मैदानात उतरवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, काल रात्री उशिरा राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतले असून यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महायुतीने अतिरिक्त उमेदवार उतरवल्यास महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : NCP Vidhan Parishad : "माझ्या संघर्षाचं हेच फळ" राष्ट्रवादीकडून झिशान सिद्धीकींना उमेदवारी जाहीर, अमोल मिटकरी यांचा नाराजीचा सूर?
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे स्वतःचे उमेदवार निवडून आणल्यानंतरही अतिरिक्त मतांचा कोटा शिल्लक राहतो. या मतांच्या जोरावर मविआच्या उमेदवाराला धक्का देण्यासाठी महायुती एका जादा उमेदवाराला संधी देण्याची शक्यता आहे. या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी काल रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज दुपारी ३ वाजता संपत आहे. त्यामुळे आता अवघे काही तास शिल्लक असताना महायुती आपला पत्ता उघड करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कालच्या बैठकीत उमेदवाराच्या नावावर आणि मतांच्या बेरजेवर सविस्तर चर्चा झाली आहे. तर पुढील काही तासांत महायुती आपला अतिरिक्त उमेदवार जाहीर करणार की नाही, याबाबतची चित्र स्पष्ट होईल.