Indian Railway Network : उत्तर प्रदेशातील मथुरा हे शहर भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान म्हणून जगप्रसिद्ध आहे, मात्र येथील रेल्वे जंक्शनने एक असा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे जो ऐकून विकसित देशही थक्क होतील. मथुरा जंक्शनने रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत अमेरिका, चीन आणि जपानसारख्या देशांना मागे टाकले आहे. हे जगातील एकमेव असे जंक्शन आहे जिथून 7 वेगवेगळ्या दिशांना रेल्वे मार्ग फुटतात. विशेष म्हणजे, मथुरा जंक्शन हे प्लॅटफॉर्मची संख्या किंवा प्रवाशांच्या गर्दीमुळे नाही, तर जबरदस्त तांत्रिक कनेक्टिव्हिटीमुळे याचे जागतिक नकाशावर नाव झाले आहे.
अद्वितीय सात दिशांची कनेक्टिव्हिटी
जगातील कोणत्याही रेल्वे स्थानकावर एकाच वेळी 7 दिशांना जाणारे मार्ग उपलब्ध नाहीत, जे मथुरेत पाहायला मिळतात. इथून उत्तर दिशेला दिल्ली आणि अमृतसर; दक्षिण-पूर्व दिशेला आग्रा मार्गे मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद; पूर्व दिशेला कासगंज, लखनौ आणि बिहार; पश्चिम दिशेला अलवर, जयपूर आणि अहमदाबाद; तर दक्षिण-पश्चिम दिशेला भरतपूर मार्गे वडोदरा आणि दक्षिण भारताकडे जाण्यासाठी मार्ग उपलब्ध आहेत. याशिवाय अनेक उप-मार्ग (Branch Lines) देखील या जंक्शनला जोडलेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर देशाचे विविध कोपरे एकाच ठिकाणाहून जोडण्याची क्षमता असल्यामुळे हे जंक्शन 'ग्लोबल हब' बनले आहे.
हेही वाचा - Railway Recruitment 2026 : रेल्वेमध्ये 5000 हून अधिक पदांसाठी बंपर भरती; 10 वी उत्तीर्ण आणि ITI धारकांसाठी सुवर्णसंधी, 'असा' करा अर्ज
जगातील मोठ्या जंक्शनशी तुलना
जेव्हा मथुरेची तुलना जागतिक स्थानकांशी केली जाते, तेव्हा त्याचे महत्त्व अधिक स्पष्ट होते. अमेरिकेतील 'बेली यार्ड' हे जगातील सर्वात मोठे जंक्शन मानले जाते, परंतु तिथे प्रामुख्याने मालगाड्यांची वाहतूक होते, प्रवासी वाहतूक मर्यादित आहे. जपानचे 'शिनजुकू' स्टेशन हे जगातील सर्वात व्यस्त स्थानक असून तिथे दिवसाला 35 लाखांहून अधिक प्रवासी येतात, पण ते प्रामुख्याने मेट्रो आणि लोकल ट्रेनचे केंद्र आहे. याउलट, मथुरा जंक्शन हे लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांचे मुख्य केंद्र असून तिथून दररोज 200 हून अधिक ट्रेन धावतात. यात राजधानी, शताब्दी आणि दुरांतो यांसारख्या हाय-स्पीड ट्रेनचा समावेश आहे.
पायाभूत सुविधा आणि रेल्वे मार्ग
मथुरा जंक्शनवर प्रवाशांच्या सोयीसाठी एकूण 10 प्लॅटफॉर्म आणि 21 रेल्वे मार्ग (Tracks) बांधण्यात आले आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी हे एक महत्त्वाचे 'ट्रान्झिट पॉईंट' बनले आहे. धार्मिक पर्यटनामुळे येथे भाविकांची मोठी गर्दी असतेच, पण तांत्रिकदृष्ट्या हे जंक्शन भारतीय रेल्वेच्या जाळ्यातील सर्वात गुंतागुंतीचा आणि महत्त्वाचा दुवा आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम या चारही मुख्य दिशांसह इतर उप-दिशांना जोडणारे हे जंक्शन भारताच्या रेल्वे इंजिनीअरिंगचा एक उत्कृष्ट नमुना मानले जाते.
हेही वाचा - Cashless Toll Plaza: टोल नाक्यांवर 'कॅश'ला कायमचा रामराम?; 'या' तारखेपासून सुरू होतेय नवी डिजिटल क्रांती