Thursday, February 12, 2026 03:27:09 PM

PM Kisan Yojana : 22 व्या हप्त्यासाठी 'ही' बाब अनिवार्य! अर्थसंकल्पात रकमेबाबत काय झाला निर्णय? जाणून घ्या सविस्तर

या योजनेच्या नियमानुसार दर चार महिन्यांनी एक हप्ता दिला जातो. त्या हिशोबाने 22 वा हप्ता फेब्रुवारी 2026 च्या शेवटच्या आठवड्यात मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

pm kisan yojana  22 व्या हप्त्यासाठी ही बाब अनिवार्य अर्थसंकल्पात रकमेबाबत काय झाला निर्णय जाणून घ्या सविस्तर

PM Kisan Yojana : देशभरातील कोट्यवधी शेतकरी सध्या 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' योजनेच्या 22 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026 नंतर या योजनेच्या रकमेत वाढ होणार का, अशी मोठी चर्चा रंगली होती. शेतकरी संघटनांनीही हप्त्यात वाढ करण्याविषयी काही मागण्या समोर ठेवल्या होत्या. मात्र, सरकारने या रकमेत कोणताही बदल न करता ती 6,000 रुपये इतकीच कायम ठेवली आहे. दरम्यान, पुढचा हप्ता मिळवण्यासाठी आता केवळ ई-केवायसीच नव्हे, तर 'फार्मर आयडी' (Farmer ID) देखील अनिवार्य करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी तातडीने काही पावले उचलणे गरजेचे आहे.

22 वा हप्ता कधी जमा होणार?
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. या योजनेच्या नियमानुसार दर चार महिन्यांनी एक हप्ता दिला जातो. त्या हिशोबाने 22 वा हप्ता फेब्रुवारी 2026 च्या शेवटच्या आठवड्यात मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जरी सरकारने अद्याप अधिकृत तारखेची घोषणा केली नसली, तरी गेल्या वर्षाचा कल पाहता फेब्रुवारी अखेरपर्यंत 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात.

अर्थसंकल्पात योजनेच्या रकमेचे काय झाले?
अनेक शेतकरी संघटनांनी यंदाच्या अर्थसंकल्पात ही वार्षिक मदत 6,000 रुपयांवरून 9,000 किंवा 12,000 रुपये करण्याची मागणी केली होती. मात्र, 1 फेब्रुवारी 2026 रोजी मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासाठी 63,500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही रक्कम गेल्या वर्षीइतकीच आहे. याचा अर्थ, शेतकऱ्यांना मिळणारी वार्षिक मदत 6,000 रुपये (तीन हप्त्यांत प्रत्येकी 2,000 रुपये) एवढीच कायम राहणार आहे. रकमेत वाढ झाली नसली तरी, योजनेची व्याप्ती आणि पारदर्शकता वाढवण्यावर सरकारने भर दिला आहे.

हेही वाचा - Tractor Insurance : शेतकरी मित्रांनो, ट्रॅक्टरचा विमा काढलाय का? थोड्या प्रीमियममध्ये वाचेल लाखोंचे नुकसान; जाणून घ्या, 'हे' मोठे फायदे

आता 'फार्मर आयडी' का आहे महत्त्वाचं?
पुढील हप्ता कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळवण्यासाठी आता प्रत्येक लाभार्थ्याकडे 'फार्मर आयडी' असणे आवश्यक आहे. हा एक युनिक डिजिटल आयडी असून तो शेतकऱ्याच्या आधार कार्ड आणि जमिनीच्या रेकॉर्डशी जोडला जाणार आहे. यामुळे बनावट लाभार्थ्यांना चाळणी लावून खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पैसा पोहोचवणे सरकारला सोपे होईल. शेतकरी हा आयडी अधिकृत वेबसाईट, जवळचे सीएससी (CSC) केंद्र किंवा ग्रामपंचायतीमध्ये जाऊन बनवू शकतात. यासाठी आधार कार्ड, जमिनीचा सातबारा/आठ-अ आणि मोबाईल नंबर ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

ई-केवायसी आवश्यक
जर तुमची ई-केवायसी (e-KYC) किंवा लँड सीडिंगची प्रक्रिया अपूर्ण असेल, तर तुमचा हप्ता रोखला जाऊ शकतो. तुमचे स्टेटस तपासण्यासाठी pmkisan.gov.in या पोर्टलवर जाऊन 'Know Your Status' या पर्यायावर क्लिक करा. तिथे तुमचा नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकून माहिती अपडेट आहे की नाही, याची खात्री करा. 'फार्मर आयडी' आणि 'ई-केवायसी' पूर्ण असल्यास फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुमच्या खात्यात हा सन्मान निधी जमा होईल.

हेही वाचा - Agriculture News : ग्रामीण भागातील सरकारी जमिनींवरील अतिक्रमणाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; कायदेशीर तोडगा निघणार?


सम्बन्धित सामग्री