मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकींचा निकाल येत असतानाच महापालिकेवरील ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व संपुष्टात येणार असे चित्र दाखवत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार महायुतीने बहुतांश ठिकाणी महापालिका काबिज केल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच मुंबई महापालिकेतही भाजपने 50 चा आकडा पार केलेला आहे. सायंकाळी वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजपच्या 51 जागांवर उमेदवार विजयी झाले आहेत तर ठाकरेंच्या सेनेतील 48 उमेदवारी विजयी झाले आहेत. त्यामुळे केवळ 3 उमेदवारांच्या फरकाने भाजप आघाडीवर आहेत. तसेच आतापर्यंत 227 पैकी 134 जागांचा निकाल लागला असून अजून 93 जागांचे अधिकृत निकाल येणे असून बाकी आहे. त्यामुळे अजूनही मुंबई महापालिकेवर भाजपची पूर्णपणे सत्ता आली असं म्हणणे घाईचे ठरेल. शिवाय ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनीही हा अटीतटीचाच सामना असल्याचे नमूद केले आहे.
सायंकाळी 5 वाजेपर्यंत पक्षनिहाय निकाल
भाजपा : 51
शिवसेना - ठाकरे : 48
शिवसेना : 14
काँग्रेस : 09
मनसे : 06
एमआयएम : 04
समाजवादी पक्ष : 02
एकूण : 134 / 227
अद्याप 93 जागांचे निकाल बाकी
हेही वाचा : PMC Election Results 2026: रवींद्र धंगेकरांच्या पत्नीला मोठा धक्का! तुरुंगातून लढणाऱ्या आंदेकर भगिनी विजयी
संजय राऊत यांनी ट्वीट करत निकालांवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, मुंबई महापालिकेचा संपूर्ण निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. आताही 60 ते 75 प्रभागांची मतमोजणी शिल्लक असून सध्या दाखवले जाणारे आकडे खोटे ठरण्याची शक्यता आहे. राऊतांच्या म्हणण्यानुसार, लढत अटीतटीची असून शिवसेना - मनसे जोरदार टक्कर देत आहे. भाजपाकडून आकड्यांचा भ्रम पसरवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दुपारनंतर शिवसेना आणि मनसेचे अनेक उमेदवार विजयी झाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. मात्र, न्यूज चॅनल्सवर अजूनही जुनेच आकडे दाखवले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आता सर्वांच्या नजरा अंतिम निकालाकडे…
पाहूया, मुंबई महापालिकेची खरी सत्ता नेमकी कुणाच्या हाती जाणार?