Vikhe Patil On Uddhav Thackeray: जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शेतकरी कर्जमाफीसंदर्भात केलेल्या त्यांच्या विधानावर ठाकरे यांनी केलेल्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर देताना विखे पाटील म्हणाले की, 'माझ्या विधानाचा आणि साखर कारखान्याचा काय संबंध? आमचा कारखाना 75 वर्षांपासून सुरू आहे. ठाकरे यांनी एक तरी साखर कारखाना सुरू केला का? टीका करणे सोपे असते, पण शेतकऱ्यांसाठी काही करून दाखवा.'
विखे पाटील यांची ठाम भूमिका
विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, त्यांचे वक्तव्य शेतकरी हिताविरोधी नसून, त्याचा विपर्यास करण्यात आला आहे. ते म्हणाले, “आमचा डीएनए शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात जाण्याचा प्रश्नच नाही. माझ्या वक्तव्याचा काही भाग तोडून दाखवून मला शेतकरीविरोधी ठरवले गेले, हे दुःखद आहे.” त्यांनी सांगितले की, ग्रामपंचायत आणि सोसायटी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेले विधान हे वास्तव मांडण्यासाठी होते. ग्रामीण भागात लोक निवडणुका लढवण्यासाठी कर्ज घेतात, पण त्या कर्जातून काही उत्पादकता होत नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होतात, असेही त्यांनी नमूद केलं.
हेही वाचा - NDA Commandant : नौदलातील अधिकाऱ्याच्या NDA च्या प्रमुखपदी नियुक्तीची शक्यता; कोण आहेत व्हाइस ॲडमिरल अनिल जग्गी?
उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले?
विखे पाटील यांनी ठाकरे यांच्यावर पलटवार करत विचारले, अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना ठाकरे यांनी एकही शेतकरी हिताचा निर्णय घेतला नाही. कृषीमंत्री असताना मी सुरू केलेल्या अनेक योजना आजही शेतकऱ्यांना उपयोगी पडत आहेत. ठाकरे यांनी मराठवाड्यात मदतीच्या घोषणा केल्या, पण त्यांची अंमलबजावणी झाली नाही.
हेही वाचा - Laxman Hake: “मुळशी पॅटर्न 2 नव्हे, ‘पवार पॅटर्न बारामती’ बनवा”, पार्थ पवारांच्या जमीन प्रकरणावर लक्ष्मण हाकेंनी साधला जोरदार निशाणा
संघ आणि शिवसेना वादावर प्रतिक्रिया
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपाचे पाठबळ आहे, हे सर्वांना माहित आहे. आता ठाकरे शिळ्या कढीला उत आणत आहेत. त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच उरले नाही. त्यांच्या घरावर कोण घिरट्या घालतंय हे मला माहीत नाही, पण ते स्वतःभोवतीच फिरत आहेत, असा टोलाही यावेळी विखे पाटील यांनी लगावला. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांसाठी एखादा उद्योग चालवून दाखवा असे खुले आव्हान केले. त्याचबरोबर, आपल्या विधानाचा विपर्यास करून राजकीय फायद्यासाठी टीका करण्यात आल्याचा आरोपही केला.