Saturday, May 17, 2025 09:26:54 PM

Chanakya Niti: पालकांनी आपल्या मुलांचं संगोपन करताना 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवाव्या..

चांगली मुलेच चांगला देश घडवू शकतात. ती देशाची प्रगती घडवून आणतात. चांगली मुले उद्याचे चांगले, सक्षम नागरिक असतात. त्यामुळे मुलांचे योग्य संगोपन करणे, त्यांच्यावर चांगले संस्कार करणे ही देशसेवाच आहे.

chanakya niti पालकांनी आपल्या मुलांचं संगोपन करताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवाव्या

Chanakya Niti Tips For Parents: आचार्य चाणक्य हे भारतातील खूप मोठे विद्वान होते. चाणक्य यांनी नीतिशास्त्राची रचना केली, ज्याला ‘चाणक्य नीती’ या नावाने ओळखले जाते. चाणक्य नीतीमध्ये माणसाने जीवन कसे जगावे, याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यातील काही उदाहरणे, तत्त्वे आणि शिकवणी आजही अनेक ठिकाणी आजही लागू पडतात.

चाणक्यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये मोठ्या माणसांनीच कसे रहावे, कसे वागावे हे तर सांगितले आहेच. शिवाय, लहान मुलांचे संगोपन कसे करावे, त्यांच्यावर कसे संस्कार करावेत, कोणत्या वयात त्यांना कोणते वळण कसे लावावे, याविषयी देखील मार्गदर्शन केले आहे. चाणक्यांनी मुलांच्या संगोपनावर वारंवार भर दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पालकांनी आपल्या मुलांना गुणवत्तापूर्ण बनवावे, त्यांची काळजी घ्यावी आणि त्यांना वाया जाऊ देऊ नये.

हेही वाचा - Chanakya Niti: आचार्य चाणक्यांचा विद्यार्थ्यांसाठी गुरुमंत्र; यश हवंय ना? मग या 4 गोष्टी नक्की करा

स्वतःचे घर ही पहिली शाळा
मुलांची पहिली शाळा त्यांचे स्वतःचे घर असते. इथेच त्यांच्यावर संस्कार होतात. एक लहान मूल निरागस असते. ते आजूबाजूला दिसणाऱ्या व्यक्तींची वागणूक, बोलणे, भाषा, लकबी पाहून त्याच गोष्टींचे अनुसरण करते. त्यामुळे त्यांच्यासमोर आपल्या वागण्याची काळजी घेणे म्हणजेच, आपली वागणूक योग्य ठेवणे आवश्यक आहे. म्हणूनच प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांबद्दल खूप गंभीर असले पाहिजे आणि चांगल्या वर्तनाचे उदाहरण ठेवले पाहिजे. चाणक्यांनी सांगितले आहे की, जर घरातील मुले चांगली घडवली गेली नाहीत, त्यांना वाईट सवयी, वाईट संगत, वाईट वळण लागले तर, अशा मुला-मुलींमुळे संपूर्ण घराला त्रास होतो. मुले चांगली कर्मे करणारी नसतील तर, ती संपूर्ण कुटुंबाचा नाशही करू शकतात.

एकेन शुष्कवृक्षेण दह्यमानेन वह्निना ।
दह्यते तद्वनं सर्वं कुपुत्रेण कुलं यथा ॥

या नीतीमध्ये चाणक्य श्लोकांच्या माध्यमातून सांगत आहेत की, ज्याप्रमाणे एखाद्या सुकलेल्या झाडाला आग लागली की, संपूर्ण जंगल जळून राख होते, त्याचप्रमाणे एका वाईट मुलामुळे संपूर्ण कुटुंब नष्ट होते..
वाईट वळण लागलेली आणि दुष्ट प्रवृत्तीची, अवज्ञाकारी मुले संपूर्ण घराचा समाजातील मान-सन्मान नष्ट करतात आणि संपूर्ण कुळाचा नाश करतात, असे ते सांगतात.

हेही वाचा - Chanakya Niti : 'हे' लोक सापापेक्षा हजार पटींनी वाईट, आयुष्यात दुर्दैवच घेऊन येतात..! तुमच्याही सहवासात असे कोणी आहे का?

चाणक्य म्हणतात, जंगलातील एक झाड जरी सुकले आणि आग लागली तर आजूबाजूची झाडे जरी हिरवीगार असली, तरी ते सुकलेले झाड संपूर्ण जंगलाला आगीच्या हवाली करण्यास कारणीभूत ठरते.. त्या झाडाची आग थोड्याच वेळात उग्र रूप धारण करते आणि संपूर्ण जंगलाला वेढून टाकते आणि अख्खे जंगल जळून खाक होते. त्याचप्रमाणे, वाईट प्रवृत्ती असलेले मूल कितीही सुंदर असले तरी एक ना एक दिवस ते कुटुंबाचा आणि कुळाचा अभिमान नष्ट करतात. समाजात त्याच्या वाईट वागणुकीमुळे कुटुंबाला अपमान सहन करावा लागतो. एक दुष्ट मुलगा संपूर्ण कुटुंबाचा आदर आणि सन्मान नष्ट करू शकतो, असे चाणक्यांनी नमूद केले आहे.

मुलांवर संस्कार करणे खूप महत्त्वाचे
- चाणक्य म्हणतात की, मुलांवर नेहमी लक्ष ठेवले पाहिजे. त्यांना वाईट सवयी लागणार नाहीत, यासाठी काळजी घेतली पाहिजे आणि त्यांना वेळीच सुधारणे खूप महत्त्वाचे आहे. कुटुंबाचा विनाश थांबवायचा असेल तर मुलांना नियंत्रणात ठेवा आणि त्यांच्या संस्कारांकडे लक्ष द्या.
- एक उत्कृष्ट आणि आज्ञाधारक मूल संपूर्ण कुळ पुढे नेते आणि स्वतःच्या कुटुंबाचा, घराण्याचा समाजात मान-सन्मान वाढवते. त्यामुळे मुलांना चांगले शिक्षण व संस्कार देणे अत्यंत गरजेचे आहे, नाहीतर त्यांचे आणि कुटुंबाचे भविष्य अंधारात असेल असे ते सांगतात.
- चांगली मुलेच चांगला देश घडवू शकतात. ती देशाची प्रगती घडवून आणतात. चांगली मुले उद्याचे चांगले, सक्षम नागरिक असतात. त्यामुळे मुलांचे योग्य संगोपन करणे, त्यांच्यावर चांगले संस्कार करणे ही देशसेवाच आहे. हे अत्यंत जबाबदारीचे काम आहे.

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री