Holi Colours Removal Tips: होळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि रंगांची उधळण. पण उत्सव संपल्यानंतर खरी कसरत सुरू होते ती म्हणजे अंगावरचे हट्टी रंग काढण्याची. अनेकदा हे रंग काढताना आपल्याला घाम फुटतो, तरीही ते दिवसांनुदिवस त्वचेवर तसेच राहतात. अशा वेळी घाईघाईत वारंवार साबण वापरल्याने किंवा जोरात स्क्रब केल्याने त्वचा कोरडी, निस्तेज आणि खराब होऊ शकते. मात्र, आता काळजी करण्याची गरज नाही. काही सोप्या आणि नैसर्गिक घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही तुमच्या त्वचेला कोणतीही इजा न पोहोचवता हे रंग सहज काढू शकता.
साबणाचा अतिवापर टाळा आणि नैसर्गिक ओलावा जपा
होळी खेळून झाल्यानंतर लगेच चेहरा आणि शरीर वारंवार साबणाने धुणे चुकीचे आहे. साबणामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते, ज्यामुळे खाज किंवा जळजळ वाढू शकते. त्याऐवजी प्रथम साध्या पाण्याने अंगावरचा रंग मऊ करून घ्या आणि त्यानंतरच एखाद्या सौम्य फेसवॉशचा वापर करा. यामुळे त्वचेचा ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.
दूध, तेल आणि क्लिंजिंग क्रीमचा प्रभावी वापर
हट्टी रंग काढण्यासाठी दूध आणि तेलाचे मिश्रण अत्यंत गुणकारी ठरते. एका कप थंड दुधात थोडे तीळ किंवा नारळाचे तेल मिसळून ते त्वचेला लावा. काही मिनिटे हलक्या हाताने मालिश केल्यावर स्वच्छ पाण्याने धुवा; यामुळे रंग तर निघतोच, पण त्वचेला खोलवर पोषणही मिळते. तसेच, चांगल्या दर्जाच्या क्लिंजिंग क्रीमने चेहऱ्याला मसाज करून ओल्या कापसाने पुसून घेतल्यास त्वचा मऊ राहते आणि रंगही सहज स्वच्छ होतो.
जळजळीसाठी व्हिनेगर आणि बेसनाचा पॅक
जर रंगांमुळे त्वचेला खाज किंवा जळजळ होत असेल, तर पाण्यात थोडे व्हिनेगर मिसळून ते बाधित जागी हळूवार लावावे, यामुळे त्वरित आराम मिळतो. तसेच, बेसन आणि कोरफड जेल (Aloe Vera) एकत्र करून तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे लावून ठेवा. ही पेस्ट वाळल्यानंतर धुवून टाका. यामुळे केवळ रंगच निघणार नाही, तर तुमची त्वचा थंड आणि ताजीतवानी दिसेल.
हेही वाचा - Nail Shapes : तुमच्या हातांना द्या परफेक्ट लूक! जाणून घ्या नखांचे ट्रेंडी आकार
रंग काढताना घ्यायची महत्त्वाची खबरदारी
होळीचे रंग काढताना नेहमी लक्षात ठेवा की त्वचा जास्त घासणे हानिकारक ठरू शकते. रासायनिक उत्पादनांऐवजी नैसर्गिक पद्धतींचा अवलंब केल्यास उत्सवाच्या मजेनंतर तुमच्या सौंदर्यावर कोणतेही विपरीत परिणाम होणार नाहीत. जर घरगुती उपायांनंतरही त्वचेची जळजळ थांबत नसेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल.