Ahilyanagar Crime : "सगळं काही सासूमुळे झालं, नवऱ्याने कधीच प्रेम केलं नाही..." अशा शब्दांत आपल्या काळजाचा तुकडा असलेल्या चिमुरडीला कायमचा निरोप देत एका 23 वर्षीय माऊलीने आपली जीवनयात्रा संपवली. राहाता तालुक्यातील एकरुखे येथे हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून प्रिया शुभम ढगे या विवाहितेने विहिरीत उडी घेऊन टोकाचं पाऊल उचललं. प्रियाने लिहिलेली शेवटची चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असून, सासरच्यांच्या अमानुष वागणुकीचा पाढाच तिने पत्रात वाचला आहे.
चार लाखांच्या मागणीसाठी अमानुष छळ
प्रियाच्या नातेवाई असलेल्या एका महिलेने सांगितले की, 'घराच्या बांधकामासाठी सासरकडून चार लाख रुपयांची मागणी केली जात होती. लग्नात हौस-मौज झाली नाही, या कारणावरून 2024 पासून प्रियाचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता. इतकेच नव्हे तर, तिच्यावर दागिने आणि पैसे चोरीचा खोटा आळही घालण्यात आला होता.' प्रियाच्या पतीने दारूच्या नशेत तिला वारंवार बेदम मारहाण केल्याचेही नातेवाईकांनी सांगितले.
हृदयद्रावक नोट: "सॉरी श्रेया, तुला सोडून जातेय..."
मृत्यूपूर्वी प्रियाने लिहिलेल्या पत्राने उपस्थितांचे डोळे पाणावले. या पत्रात तिने नमूद केले आहे की, "मी खूप सहन केलं, पण आता शक्य नाही. नवरा शुभमवर मी प्रेम केलं, पण त्याचं प्रेम फक्त त्याच्या कुटुंबावर होतं. सासूला फक्त आमची भांडणं लावून देण्यात रस होता. मी कोणतीही चोरी केली नाही. मला नोकरी करायची होती पण त्यांनी करू दिली नाही. माझी छोटी श्रेया मला 'मम्मी' म्हणायची, तिला महिनाभर पाहिलं नाहीये, तिची खूप आठवण येतेय. ताई, आता श्रेयाला तुझ्याकडे सोपवून जातेय, तिची काळजी घे."
हेही वाचा - Nashik Crime News: माणुसकीला काळिमा! 25 लाख दिले, 21 तोळे सोनंही दिलं; तरी सासरच्यांची हाव संपेना; शेवटी छळाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल
सासरच्या तिघांना बेड्या
या धक्कादायक घटनेनंतर राहाता पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत. प्रियाचे वडील आणि नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून, शुभम ढगे (पती), राजेंद्र ढगे (सासरा), प्रतिभा ढगे (सासू) या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.