मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये मोठ्या संघटनात्मक बदलांची चाहूल लागली आहे. पक्षाच्या कार्यकारिणीत फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आदित्य ठाकरे यांना पक्षाचे कार्याध्यक्षपद दिले जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
2003 मध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. आता त्याच धर्तीवर पक्षात नव्या पिढीला संधी देण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.
या संदर्भात खासदार संजय राऊत यांनीही तरुण नेतृत्वाला संधी देण्याची गरज व्यक्त केली होती. पक्षाच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर लवकरच बैठक होणार असून, त्यात संघटनात्मक फेरबदलांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: BKC Crane Accident: बीकेसीत पहाटेच्या अंधारात क्रेन उलटून कोसळला मेट्रोचा महाकाय बीम; विकासाच्या वेगाला अपघाताचं ग्रहण?
राजकीय विश्लेषक किरण तारे यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, तरुण नेतृत्वाला संधी देणे ही सकारात्मक बाब असली, तरी त्यामुळे पक्षाला लगेचच मोठे राजकीय यश मिळेल असे नाही. “आदित्य ठाकरे यांना जबाबदारी दिली गेली, तर त्याचे स्वागतच आहे. मात्र, त्याचा तात्काळ निवडणूक निकालांवर परिणाम होईल, असे मानणे योग्य ठरणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. “आदित्य ठाकरे हे तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत, जनसामान्यांमध्ये मिसळलेले आहेत. त्यामुळे ते पक्षाला नव्या दिशेने घेऊन जातील,” असे त्या म्हणाल्या.
मात्र, काही दिवसांपूर्वी दिल्लीत पक्षाच्या काही खासदारांनी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वशैलीबाबत नाराजी व्यक्त केल्याच्या चर्चाही समोर आल्या होत्या. त्यामुळे संघटनात्मक बदल पक्षाला बळ देतील की अंतर्गत नाराजी वाढवतील, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: Raju Shetti : एक किलोमीटरला 254 कोटी?; राजू शेट्टींचा थेट सवाल, शक्तीपीठ महामार्गाच्या खर्चावरून सरकारवर डागली तोफ