राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. तसेच राजकीय वर्तुळातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्रीपदासह अर्थखातंही होतं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष होते. त्यामुळे पक्षांची धुरा कोण सांभाळणार, तसेच उपमुख्यमंत्रीपदी कोण बसणार, या सर्व विषयांवर चर्चा रंगू लागल्या आहेत. या दरम्यान, आज राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अशातच उपमुख्यंत्रीपदाचा पेच लवकरात लवकर सुटेल, असे चित्र दिसून येत आहे.
हेही वाचा- Ajit Pawar Funeral : अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी पोलीस मानवंदना देताना Gun Firing चा आवाज, नेमकं काय घडलं?
उपमुख्यमंत्री पदाचा शपथीविधीसाठी आणखी दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बारामतीला जाणार आहेत. यादरम्यान सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सर्व आमदारांची बैठक बोलवण्यात येणार आहे. आमदारांच्या बैठकीत गटनेता निवड आणि सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. यानंतर आमदारांचा संमतीच पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार तसेच प्रस्ताव राज्यपाल याना देण्यात येणार आहे. राज्यपाल यांच्या समंतीनंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी मोठं विधान केलं आहे. जर उद्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय झाला तर उद्याच नव्या उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे.