बारामती परिसरात घडलेल्या भीषण विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, वित्त मंत्री तसेच बीड आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याची बातमी समोर येताच संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अचानक जाण्याने राजकीय वर्तुळासह सामान्य नागरिकांमध्येही तीव्र दुःख व्यक्त केलं जात आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार पुण्याहून बारामतीकडे प्रवास करत असताना पुणे–बारामती परिसरात त्यांच्या विमानाला अपघात झाला. या दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. उपचारांसाठी हलवण्यात आल्यानंतर त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती समोर आली आणि राज्यभरात शोक व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही भावना व्यक्त करत ‘still can’t believe it…’ असा WhatsApp Status ठेवला आहे.
अपघातानंतर अजित पवार यांचे पार्थिव बारामती येथील रुग्णालयातून हलवून अंतिम दर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानमध्ये नेण्यात आलं. पार्थिव ठेवण्यासाठी काचेची विशेष पेटी आणण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत हजारो कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांनी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर गर्दी करत अखेरचं दर्शन घेतलं.
राज्यातील अनेक नेते अंतिम दर्शनासाठी बारामतीत दाखल झाले. जय पवार आणि श्रीनिवास पवार यांच्यासह कुटुंबीयही यावेळी उपस्थित होते. बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून सकाळी 11 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी बारामतीत उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक अनुभवी, धडाडीचा नेता गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.