Friday, February 13, 2026 06:02:55 PM

Maharashtra Cabinet Reshuffle: अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी; मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व आणि मंत्रिपदांबाबत हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत.

maharashtra cabinet reshuffle अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हिस्सेदारी कायम ठेवण्याच्या दृष्टीने पक्ष पातळीवर आणि महायुतीमध्ये चर्चा सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवारांकडे अर्थ, नियोजन, उत्पादन शुल्क ही महत्त्वाची खाती होती. याशिवाय क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही दोन खाती त्यांच्याकडे अतिरिक्त प्रभार म्हणून होती. त्यांच्या निधनानंतर ही सर्व खाती सध्या रिक्त आहेत. राकांपाच्या बहुतांश नेत्यांची भूमिका अशी आहे की, अजित पवारांकडे असलेली सर्व खाती पक्षाकडेच राहावीत. सूत्रांच्या माहितीनुसार, या मागणीला भाजप आणि शिवसेनेकडूनही कोणताही आक्षेप नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) मंत्रिपदांसाठी अंतर्गत पातळीवर एकमत ठरवल्यानंतर महायुतीकडून अधिकृतपणे मंत्रिमंडळात बदल करण्यात येणार आहेत. मात्र, त्याआधी पक्षासमोर काही महत्त्वाचे प्रश्न उभे आहेत. पक्षाचा पुढील अध्यक्ष कोण होणार, उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी कोणाकडे जाणार, तसेच बारामतीची राजकीय वारसा पुढे कोण सांभाळणार, यावर स्पष्ट भूमिका घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा: Ladakh Red Aurora : लडाखचे आकाश झाले लालबुंद! पुन्हा एकदा 'ते' वादळ धडकण्याची शक्यता, शास्रज्ञांनी दिला मोठा इशारा

या निर्णयांसाठी राकांपाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, पवार कुटुंब सध्या शोकाकुल अवस्थेत असून, 13 दिवसांचा सूतक कालावधी पूर्ण झाल्यानंतरच या विषयावर औपचारिक चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बैठक किमान 15 दिवसांनंतरच होईल, असे संकेत आहेत.

या बैठकीनंतर पक्षाध्यक्षपद, उपमुख्यमंत्रीपद, बारामती विधानसभा मतदारसंघातील संभाव्य पोटनिवडणूक आणि जिल्हा परिषद निवडणुकांतील रणनीती यावर निर्णय घेतला जाणार आहे. तसेच निवडणुकांनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा (अजित पवार गट आणि शरद पवार गट) पुन्हा एकत्र येण्याचा मुद्दा देखील चर्चेत राहणार आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये युती होण्याची शक्यता आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांप्रमाणेच ही युती मर्यादित स्वरूपात असू शकते. मात्र, सध्या ही चर्चा केवळ निवडणूक समन्वयापुरती असून, पक्षविलीनीकरणाबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. 

हेही वाचा: Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! पाण्यासाठी करावी लागणार कसरत, 'या' भागात 10 दिवस असणार पाणीटंचाई


सम्बन्धित सामग्री