राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात शोककळा पसरली आहे. पवार कुटुंबीयांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाच, त्यांच्या अपघाताबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. अशातच, अपघातापूर्वी अजित पवारांनी साधलेला शेवटचा संवाद समोर आल्याने भावनिक वातावरण निर्माण झालं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात अजित पवार यांचा फोनवरील शेवटचा संवाद सर्वांसमोर ऐकवण्यात आला. हा संवाद त्यांच्या चुलत पुतण्या श्रीजित पवार यांच्याशी झाला होता. विशेष म्हणजे, हा कॉल अजित पवार विमानप्रवासात असतानाच झाला होता, अशी माहिती श्रीजित पवार यांनी दिली.
श्रीजित पवार यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सकाळी साधारण 8 वाजून 19 मिनिटांनी अजित पवार यांना एक संदेश पाठवला होता. नेटवर्क उपलब्ध होताच अजित पवार यांनी स्वतःहून विमानातून फोन केला. त्या संभाषणात अजितदादांनी नेहमीप्रमाणे संयमी आणि समावेशक भूमिका मांडली.
जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका विशिष्ट समाजाला उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू होती. त्यासंदर्भात श्रीजित पवार यांनी अजितदादांकडे विनंती केली होती. यावर उत्तर देताना अजित पवार यांनी “आपण सगळ्या जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालायचं आहे,” अशी स्पष्ट भूमिका मांडली. राजकारण करताना कोणत्याही एका घटकापुरतं मर्यादित न राहता सर्वांना न्याय देण्यावर त्यांनी भर दिला.
त्या संभाषणात अजित पवार यांनी यापूर्वी विविध ठिकाणी दिलेल्या उमेदवारांची उदाहरणं देत, ओबीसींसह सर्व समाजघटकांना संधी दिल्याचंही नमूद केलं. “कुठे कुणाला उमेदवारी दिली, कुठे संधी मिळाली नाही, याचा हिशेब आपण समतोलपणे पाहतो,” अशा आशयाचं त्यांचं बोलणं होतं, असं श्रीजित पवार यांनी सांगितलं.