मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील एक अनुभवी नेतृत्व, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्य हादरले होते. बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ विमानाचा झालेला तो भीषण अपघात केवळ एक तांत्रिक बिघाड होता की त्यामागे काही छुपे कारस्थान होते, यावरून आता संशयाचे धुके गडद होऊ लागले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणावर केलेल्या स्फोटक विधानांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
ब्लॅक बॉक्सचे 'गुपित' आणि आव्हाडांचा संशय
जितेंद्र आव्हाड यांनी या अपघातातील सर्वात महत्त्वाच्या पुराव्यावर, म्हणजेच 'ब्लॅक बॉक्स'वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "जगातील कोणत्याही विमान अपघातात ब्लॅक बॉक्स जळून खाक झाल्याचे उदाहरण नाही," असे सांगत आव्हाडांनी तांत्रिक विसंगतीकडे लक्ष वेधले. "ब्लॅक बॉक्स हा टायटॅनियमसारख्या धातूपासून बनवलेला असतो, जो 11 हजार अंश सेल्सिअस तापमानातही सुरक्षित राहू शकतो. ज्या ठिकाणी हा बॉक्स असतो, तो विमानाचा भाग शाबूत असताना केवळ ब्लॅक बॉक्सच कसा जळाला? हा निव्वळ योगायोग नसून मोठ्या संशयाला जागा देणारी बाब आहे," असे गंभीर विधान आव्हाड यांनी केले.
या भीषण अपघाताच्या मुळाशी जाताना जितेंद्र आव्हाड यांनी विमानाची तांत्रिक क्षमता आणि उड्डाण परवानग्यांबाबत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आणली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, ज्या 'लिअरजेट 45' विमानाला पाच हजार तासांपेक्षा जास्त उड्डाण करण्याची कायदेशीर परवानगी नव्हती, ते विमान तब्बल आठ हजार तासांहून अधिक काळ हवेत झेपावले होते. सुरक्षेचे इतके मूलभूत नियम धाब्यावर बसवून या विमानाला भारतात उडण्याची परवानगी कोणी आणि कशी दिली, हा आता सर्वात मोठा यक्षप्रश्न ठरत आहे.
हेही वाचा: Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash : 'ब्लॅक बॉक्स जळाला पण आमच्याकडे फोटो...', अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
या विमान कंपनीच्या मालकी हक्काबाबतही आता मोठे गूढ निर्माण झाले असून, यात नेमकी गुंतवणूक कोणाची आहे आणि ही कंपनी कोणाच्या वरदहस्ताने चालविली जात होती, याकडेही आव्हाडांनी लक्ष वेधले आहे. विशेषतः नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) यांसारख्या सर्वोच्च नियामक संस्थेची भूमिकाही आता संशयाच्या फेऱ्यात आली आहे. DGCA मधील वरिष्ठ अधिकारी एखाद्या राजकीय दबावाखाली काम करत आहेत का? आणि या अपघाताशी संबंधित महत्त्वाची तथ्ये जाणीवपूर्वक दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे का? असे गंभीर सवाल उपस्थित करत आव्हाडांनी या प्रकरणाच्या पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे.
रोहित पवारांच्या संशोधनाला पाठबळ
दिवंगत अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी या प्रकरणाचा सखोल अभ्यास केला असून, त्यांनी मांडलेली वस्तुस्थिती खोडून काढता येण्यासारखी नाही, असेही आव्हाडांनी नमूद केले. "एका मोठ्या लोकनेत्याचा जीव गेला आहे. जर यंत्रणा सत्य लपवत असतील, तर संशय अधिक बळावणार," असे सांगत त्यांनी या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
अधिवेशनात गाजणार मुद्दा
आजपासून सुरू होणारे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन या विमान अपघाताच्या चौकशीवरून वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधक या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरण्याच्या तयारीत असून, 'ब्लॅक बॉक्स'चे सत्य बाहेर येणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: New Pension Rules: EPFO चा मोठा निर्णय, 12 वर्षांनंतर जुना नियम पुन्हा लागू; तुमच्या पगारावर काय होणार परिणाम? वाचा