Ajit Pawar Plane Crash: जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये शोककळा पसरवणारी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीतील गोदापाली परिसरात अपघात झाला असून, या दुर्घटनेत त्यांचे निधन झाले आहे, अशी अधिकृत माहिती समोर आली आहे.
सकाळी सुमारे 8.50 वाजण्याच्या सुमारास लँडिंगदरम्यान विमानाला अपघात झाला. पुण्यातून बारामतीकडे रवाना झालेले अजित पवार निवडणूक सभेसाठी जात होते, मात्र ही दुर्दैवी घटना राज्यभरात खळबळ निर्माण करणारी ठरली. अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. अपघातानंतर तातडीने बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली.
अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, उपमुख्यमंत्र्यांनी प्रवास केलेले विमान खासगी VSR कंपनीचे होते. या विमानाने सकाळी 08:10 वाजता मुंबईहून उड्डाण केले होते, तर 08:50 वाजता बारामती येथे लँडिंग नियोजित होते. विमानात एकूण पाच प्रवासी होते, ज्यामध्ये अजित पवार, त्यांचा मुंबई पीएसओ HC विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश होता. तसेच, कॅप्टन साहिल मदान आणि यश हेही या उड्डाणाशी संबंधित होते.
सूत्रांनी सांगितले की, अजित पवार यांनी वापरलेले हे विमान तुलनेने जुने होते. VSR कंपनीच्या विमानांबाबत यापूर्वीही काही वेळा तांत्रिक अडचणींच्या तक्रारी आल्या होत्या, मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक विभागाने चौकशीचे आदेश देण्याची शक्यता आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, विमानाची तांत्रिक स्थिती तपासली गेली होती का, याबाबत तपास सुरू आहे. अधिकृत अहवालानंतरच सत्य स्पष्ट होणार आहे.