बारामती: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुंबईहून बारामतीकडे येत असताना, बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असताना वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि विमानाला भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
नियतीचा क्रूर खेळ: चार दिवसांपूर्वीच्या विधानाने डोळे पाणावले
विशेष म्हणजे, अवघ्या चार दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात जीवनाच्या नश्वरतेबद्दल भाष्य केले होते. जणू काही त्यांना काळाची चाहूल लागली होती, असेच आता त्यांच्या त्या शब्दांवरून वाटत होते अशी प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटत आहे. या भाषणात अजित पवार ते म्हणाले होते,
"कोण कायमचं राहणार आहे? तुम्ही-आम्ही आज असू, उद्या नसू. काळाचं, नियतीचं बोलावणं आल्यानंतर प्रत्येकाला जावं लागतं. राजकारण हे सर्वस्व नाही, निवडणुका संपल्या की राजकारण विसरायला हवं आणि लोकांच्या हिताची कामं करायला हवीत."
हेही वाचा: Manoj Jarange : विश्वास बसत नाही, दादांचं निधन झालं; अजित दादांच्या निधनानंतर बोलताना जरांगे पाटील प्रचंड भावूक
त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ आता समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून, 'काळाचे बोलावणे' इतक्या लवकर येईल याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती.
बारामती पोरकी; कार्यकर्त्यांना अश्रू अनावर
अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या कर्मभूमीत म्हणजेच बारामतीमध्ये जनसागर लोटला आहे. लाडक्या नेत्याला गमावल्याच्या भावनेने प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यात पाणी आहे. बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात शुकशुकाट पसरला असून, अनेक बड्या नेत्यांनी बारामतीकडे धाव घेतली आहे. आज अजित पवार यांच्या पार्थिवावर सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
हेही वाचा: PV Sindhu on Ajit Pawar Death : 'आता मला पश्चाताप...', अजित पवारांच्या अकाली एक्झिटनंतर फुलराणी पीव्ही सिंधूची भावनिक प्रतिक्रिया