Eknath Shinde On Ajit Pawar : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात आज अत्यंत जड अंतःकरणाने झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडल्यानंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. "राजकारणातले तुमचे सर्व निर्णय अचूक होते, पण जगाचा निरोप घेण्याचा हा निर्णय मात्र चुकला," अशा शब्दांत शिंदेंनी आपल्या सहकाऱ्याला श्रद्धांजली वाहिली.
'ट्रँगल ऑफ स्टॅबिलिटी' कोसळला
अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना एकनाश शिंदे म्हणाले की, "मी, देवेंद्रजी आणि अजितदादा म्हणजे महाराष्ट्राच्या स्थैर्याचा एक भक्कम 'ट्रँगल ऑफ स्टॅबिलिटी' होतो. आम्ही तिघे एकत्र आल्यामुळे राज्याच्या प्रगतीची भूमिती वेगाने विस्तारत होती. परंतु, 28 जानेवारीच्या त्या काळरात्रीने आमचा हा भक्कम आधार हिरावून नेला. नियतीने केलेला तो घात आजही मनाचा थरकाप उडवतो."
प्रशासनावरील पकड आणि 'स्कॅनिंग' नजर
अजित पवारांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना शिंदे म्हणाले, साध्या लटकणाऱ्या वायरपासून ते चुकीच्या पायरीपर्यंत, प्रशासनातील छोट्या चुकाही त्यांच्या नजरेतून सुटत नसत. 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याचा ऐतिहासिक विक्रम त्यांच्या नावावर होता. ते बाहेरून कठोर वाटत असले, तरी आतून अत्यंत मृदू होते. 'लाडकी बहीण' योजनेसाठी 46,000 कोटींची तरतूद करताना त्यांनी राज्याच्या तिजोरीचा समतोल ज्या पद्धतीने राखला, त्याला तोड नाही.
हेही वाचा - Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash : 'ब्लॅक बॉक्स जळाला पण आमच्याकडे फोटो...', अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, दादांच्या जाण्याने लाखो लोक आज अनाथ झाल्यासारखी भावना निर्माण झाली आहे. "दादा, तुम्ही नेहमी वेळेचे पक्के होतात, पण यावेळी मात्र तुमची वेळ चुकली. हा निरोप घेण्याचा निर्णय मागे घ्या आणि परत या," असे म्हणताना एकनाथ शिंदे यांचे डोळे पाणावले होते. यावेळी शिंदेंनी माजी मंत्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक, अशोक गजानन मोडक, गंगाधर पटने आणि श्रीमती निला देसाई या दिवंगत सदस्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.