Thursday, February 12, 2026 03:14:09 AM

Ajit Pawar Death : अजितदादांच्या जाण्याने बारामती पोरकी; रोहित पवारांना अश्रू अनावर

अजितदादांचे पार्थिव असलेल्या रुग्णालयाबाहेर हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले. आपल्या लाडक्या 'दादा'ला शेवटचे पाहताना आमदार रोहित पवार यांना भावना अनावर झाल्या आणि ते ढसाढसा रडले.

ajit pawar death  अजितदादांच्या जाण्याने बारामती पोरकी रोहित पवारांना अश्रू अनावर

Ajit Pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि विशेषतः बारामती शोकसागरात बुडाली आहे. या भीषण दुर्घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच हंबरडा फोडला. अजितदादांचे पार्थिव असलेल्या रुग्णालयाबाहेर हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले. आपल्या लाडक्या 'दादा'ला शेवटचे पाहताना आमदार रोहित पवार यांना भावना अनावर झाल्या आणि ते ढसाढसा रडले.

धावपट्टीवर काळाचा घाला
अजित पवार हे बारामती येथील एका सभेसाठी चार्टर्ड विमानाने प्रवास करत होते. मात्र, बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते घसरले. क्षणार्धात विमानाचा स्फोट होऊन आग लागली. या भीषण आगीत विमानातील सर्व 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

पवार कुटुंब आणि नेते बारामतीकडे रवाना
या घटनेची माहिती मिळताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल तातडीने दिल्लीहून बारामतीकडे रवाना झाले आहेत. रुग्णालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली असून, हसन मुश्रीफ आणि अनिल देशमुख यांसारख्या दिग्गज नेत्यांनाही आपल्या अश्रूंचा बांध रोखता आला नाही.

हेही वाचा - Ajit Pawar Death: अजितदादांच्या जाण्याने पवार कुटुंब पोरकं; युगेंद्र पवारांचा टाहो, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

पंतप्रधान नरेंद्र मोदींची भावूक श्रद्धांजली
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना 'तळागाळातील नेता' म्हणून संबोधित केले. पंतप्रधान म्हणाले, "अजित पवार हे महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडलेले अत्यंत मेहनती व्यक्तिमत्त्व होते. त्यांची प्रशासकीय कामाची जाण आणि गरिबांना न्याय देण्याची तळमळ ही थक्क करणारी होती. त्यांचे जाणे हा देशासाठी आणि राज्यासाठी मोठा धक्का आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे."

राजकीय क्षेत्रावर शोककळा
अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक कार्यक्षम प्रशासक आणि हक्काचा लोकनेता गमावला आहे. 'रोखठोक कामाचा माणूस' अशी ओळख असलेले दादा आज काळाच्या पडद्याआड गेल्याने सामान्यांपासून मंत्र्यांपर्यंत प्रत्येकाचे डोळे पाणावले आहेत.
 


सम्बन्धित सामग्री