पुणे: मंगळवारी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुण्यातील अलका चौकात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात भाजपचे शेकडो कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. त्यांच्या हातात तिरंगा होता आणि 'पुढची दिवाळी लाहोरमध्ये', 'जागो हिंदू जागो' अशी पोस्टरबाजीदेखील करण्यात आली होती. यादरम्यान, अलका चौकात कडेकोट पोलीस बंदोबस्त पाहायला मिळाला. यामुळे अलका चौकातील परिसरात वाहतूक कोंडी झाली. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले वीर कौस्तुब गनबोटे यांच्या नातेवाईकांनी या आंदोलनात सहभागी होऊन संपूर्ण वातावरण भावनिक केले.
हेही वाचा: पहलगाम येथे पोहोचताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी साधला पीडितांशी संवाद
या घटनेच्या निषेधार्थ, राज्यातील विविध शहरांत तीव्र निषेध नोंदवण्यात आला. या दरम्यान, विविध राजकीय नेत्यांनी मृतांच्या नातेवाईकांना भेटून त्यांना धीर दिला. त्यासोबतच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दहशतवाद्यांना इशारा देत म्हटले की, 'पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्रियजनांना गमावल्याचे दुःख प्रत्येक भारतीयाला जाणवत आहे. हे दुःख शब्दांत व्यक्त करता येत नाही. मी या सर्व कुटुंबांना आणि संपूर्ण देशाला आश्वासन देतो की निष्पाप लोकांना मारणाऱ्या या दहशतवाद्यांना आम्ही अजिबात सोडणार नाही.'