Mumbai Metro: मुंबईकरांची जीवनरेखा मानल्या जाणाऱ्या मेट्रो सेवेत दिव्यांग प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या मेट्रोमध्ये दिव्यांग नागरिकांना 25 टक्के भाडे सवलत दिली जाते. मात्र, ही सवलत पूर्णपणे मोफत करण्याची मागणी आता वेग घेत आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून दिव्यांग प्रवाशांना 100 टक्के भाडे सवलत देण्याची औपचारिक मागणी केली आहे.
दिव्यांग कार्यकर्त्यांची मागणी
ज्येष्ठ पत्रकार व दिव्यांग हक्कांसाठी कार्यरत दीपक कैटके यांनी मेट्रोमधील भाडे सवलत वाढवण्याचा मुद्दा सातत्याने मांडला होता. त्यांच्या मागणीला समर्थन देत आठवले यांनी राज्य सरकारला हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यांनी पत्रामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, दिव्यांगांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असते. मेट्रो हे त्यांच्यासाठी सर्वात सोयीचे आणि सुरक्षित वाहतूक साधन आहे. पूर्णपणे मोफत प्रवास मिळाल्यास त्यांना दैनंदिन खर्चातून मोठा दिलासा मिळेल. राज्य सरकार विविध योजना राबवत असले तरी फ्री मेट्रो प्रवास हा दिव्यांगांसाठी खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी नमूद केले आहे.
हेही वाचा - Dombivli Politics: भाजपला मोठा धक्का! रवींद्र चव्हाण यांच्या निकटवर्तीय नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांपूर्वी दिव्यांगांच्या प्रश्नांवर सरकार निर्णय घेण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. आठवले यांच्या पत्रानंतर राज्य शासनानेही या प्रस्तावावर गंभीरपणे विचार सुरू केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. जवळपास दररोज हजारो दिव्यांग नागरिक मेट्रोने प्रवास करतात आणि वाढत्या नेटवर्कमुळे त्यांचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्यास मोठा दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा - Dharavi Fire Incident: रेल्वे लाईनजवळील धारावी झोपडपट्टी येथे भीषण आग; रेल्वेसेवेवर परिणाम
सध्या कोणत्या लाईन्सवर किती सवलत?
सध्या मुंबई मेट्रोमध्ये दिव्यांगांना 25 टक्के भाडे सवलत विविध मार्गांवर लागू आहे. मात्र अक्वा लाईन (मेट्रो 3) वर अद्याप ही सवलत सुरू झालेली नाही. अधिकृत माहितीनुसार, 23 नोव्हेंबर 2025 पासून या लाईनवरही दिव्यांगांना सवलत लागू होणार आहे. आता सर्वांचे लक्ष मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्णयाकडे लागले आहे. यावर आता महाराष्ट्र सरकार नेमका कोणता निर्णय घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.