मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) आता केवळ प्रवासाचे केंद्र न राहता आधुनिक तंत्रज्ञानाचा एक जागतिक नमुना बनत आहे. टर्मिनल-2 (T2) येथे सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेले 14 हायब्रिड 'सेल्फ बॅग ड्रॉप' (SBD) काऊंटर्स प्रवाशांच्या पसंतीस उतरल्यानंतर, आता प्रशासनाने एक मोठे पाऊल उचलले आहे. सन 2028 पर्यंत विमानतळावरील सर्वच्या सर्व 212 चेक-इन काऊंटर्स 'हायब्रिड' स्वरूपात बदलण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांचा 'चेक-इन'चा वेळ वाचून विमानतळावरील गर्दीचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करणे शक्य होणार आहे.
प्रतीक्षेला पूर्णविराम, वेगाला प्राधान्य
'वेळ म्हणजे पैसा' हे सूत्र आजच्या धावपळीच्या युगात विमान प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्याच्या पारंपारिक मानवी प्रक्रियेतून एका तासाला साधारणतः 25 ते 30 प्रवाशांच्या सामानाची हाताळणी होते. मात्र, या नवीन 'सेल्फ सर्व्हिस' तंत्रज्ञानामुळे हा वेग तब्बल चार पटीने वाढणार आहे. सांख्यिकी माहितीनुसार, या यंत्रणेद्वारे एका तासात 100 ते 120 प्रवाशांचे सामान विनासायास हाताळले जाऊ शकते. यामुळे पीक अवर्समध्ये (गर्दीच्या वेळी) लागणाऱ्या लांबलचक रांगा आता इतिहासजमा होणार आहेत.
हेही वाचा: Zilla Parishad Election 2026: सिंधुदुर्गात सजले 'सखी मतदान केंद्र'; मतदानासाठी महिलांचा उदंड प्रतिसाद
वाढता प्रतिसाद आणि भविष्यातील गरज
विमानतळावरील आकडेवारी या सुविधेच्या लोकप्रियतेची साक्ष देते. सन 2024 मध्ये 3 लाख 88 हजार प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेतला होता, तर 2025 मध्ये हा आकडा झपाट्याने वाढून 5 लाख 60 हजारांच्या पार गेला आहे. प्रवाशांचा हा वाढता ओढा लक्षात घेऊनच प्रशासनाने 2028 पर्यंत संपूर्ण टर्मिनल हायब्रिड यंत्रणेने सुसज्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. ही यंत्रणा केवळ वेगवान नाही, तर टर्मिनलवरील उपलब्ध जागेचा अत्यंत कल्पकतेने वापर करण्यासही मदत करते.
हायब्रिड यंत्रणेचे 'स्मार्ट' वैशिष्ट्य
या यंत्रणेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची लवचिकता (Flexibility). ही यंत्रणा 'हायब्रिड' असल्याने गरजेनुसार ती स्वयंचलित (Self-service) किंवा मानवी सेवा (Manual) अशा दोन्ही पद्धतींनी वापरता येते. सध्या इंडिगो आणि एअर इंडिया यांसारख्या प्रमुख कंपन्यांनी याचा वापर सुरू केला असून, लवकरच लुफ्थान्सा, एअर फ्रान्स, कतार आणि स्विस यांसारख्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्याही या हायब्रिड प्रवाहात सामील होणार आहेत. यामुळे प्रवाशांना स्वतःहून बॅग ड्रॉप करण्याचा पर्याय उपलब्ध असेलच, पण तांत्रिक अडचण आल्यास मानवी मदतही तत्काळ मिळू शकेल.
डिजियात्रा आणि बायोमेट्रिक्सचे कोंदण
भविष्यातील हे विमानतळ 'डिजियात्रा' (DigiYatra) आणि बायोमेट्रिक तंत्रज्ञानाशी पूर्णपणे जोडलेले असेल. यामुळे नोंदणीकृत प्रवाशांना कागदपत्रांच्या कटकटीतून मुक्ती मिळेल. केवळ फेशिअल रेकग्निशनच्या (चेहरा ओळखणे) साहाय्याने ओळख पटवून सामानाची नोंदणी अवघ्या काही सेकंदांत पूर्ण होईल. तंत्रज्ञानाची ही गुंफण मुंबई विमानतळाला जागतिक स्तरावरील सर्वोत्तम विमानतळांच्या पंक्तीत नेऊन बसवणारी ठरेल, यात शंका नाही.
हेही वाचा: India-US Trade Deal: भारतात अमेरिकन वाइन येणार, पण दूध-धान्याला मात्र 'नो एन्ट्री'; मोदी सरकारने जपलं शेतकऱ्यांचं हित