वर्धा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी पीएम जनमन, धरती आबा सारख्या अनेक योजना नव्याने सुरु केल्या. राज्यात या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. वर्धा येथे नव्याने लोकार्पण झालेली प्रकल्प कार्यालयाची इमारत यासाठी महत्त्वाचे योगदान देईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
वर्धा येथील इव्हेंट सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सेवा पंधरवड्याचा समारोप तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय इमारतींचे लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. मी मुख्यमंत्री असताना वर्धा येथे पंकज भोयर यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याने प्रकल्प कार्यालय मंजूर केले होते. या कार्यालयाचे लोकार्पण देखील माझ्या हस्ते होत आहे. आदिवासी समाज पुढे गेला पाहिजे, यासाठी प्रधानमंत्र्यांच्या दूरदृष्टीने सातत्याने काम केले जात आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच द्रौपदी मुर्मू यांच्या रुपाने आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्या आणि देशात एका नवीन पर्वाला सुरुवात झाली. राज्यात 2014 मध्ये आमचे सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये आम्ही सेवा हमी कायद्या करण्याचा निर्णय घेतला. आज सेवा ही हमी झाली आहे. प्रत्येकाला सेवा मिळविण्याचा हक्क प्राप्त झाला. वेळेत सेवा न दिल्यास दंडाची तरतूद देखील करण्यात आली आहे. आ.समिर कुणावार यांनी त्यावेळी आपल्या मतदारसंघात मोठ्या संख्येने समाधान शिबिरे घेतले. एकाच मतदारसंघात 50 हजारावर नागरिकांना लाभ त्यांनी दिला. त्यांची ही कल्पना आम्ही राज्यभर राबविली. मधल्या काळात शासन आपल्या दारी हे उपक्रम राज्यभर राबविले. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला पाहिजे, हीच या मागची भावना असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
हेही वाचा : अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू; भाविकांसाठी नविन नियमावली
लॅाजिस्टिकच्याबाबतीत वर्धा महत्वाचा जिल्हा ठरेल
समृद्धी महामार्ग वरदान ठरला आहे. नागपूर, वर्धाच्या परिसरात आपण सर्वात मोठा लॅाजिस्टिक पार्क करतो आहे. शक्तीपीठ महामार्ग देखील वर्ध्यावरून जात आहे. विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्राला जोडणार हा महामार्ग देखील शेतकरी, उद्योगांसाठी फायद्याचा ठरेल. यामुळे भविष्यात लॅाजिस्टिकच्या बाबतीच वर्धा महत्वाचा जिल्हा ठरणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
वर्ध्यात जास्तीत जास्त लखपती दिदी होण्याचा विश्वास
राज्यात 1 कोटी लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनविण्याचा संकल्प आपण केला आहे. स्वत:च्या बळावर दरवर्षी एक लक्ष रुपये आमच्या बहिणी कमावतील. आतापर्यंत 25 लक्ष लखपती दिली झाल्या आहेत. पुन्हा 25 लक्ष बहिणी लखपती दिदी होत आहे. पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या पुढाकाराने राज्यात जास्तीत जास्त लखपती दिदी वर्धा जिल्ह्यात होतील, अशा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
वैनगंगा नळगंगेचे काम याचवर्षी सुरु करण्याचा प्रयत्न
वैनगंगा नळगंगा हा प्रकल्प राज्याचा अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा लाभ देखील वर्धा जिल्ह्याला होणार आहे. हा प्रकल्प याच वर्षी सुरु करण्याचा प्रयत्न आहे. प्रकल्पामुळे लाखो एकर जमीन ओलिताखाली येणार असून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडणार आहे. 1 लाख कोटी रुपयांचा खर्च प्रकल्पावर होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बील माफी, आता मिळणार दिवसा वीज
शेतकऱ्यांना वीज बिलाची माफी देण्यात आली. आता त्यांना दिवसा अखंडीत 12 तास वीज पुरवठा देण्यासाठी राज्यात सौर वाहिनींचे काम मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. लवरकच शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी मागणी केलेल्या वर्धा कृषि उत्पन्न बाजार समितीचा विकास बीओटी तत्वावर करण्यास मान्यता देऊ तसेच वर्धा शहरातील रामनगर येथील लीज जमीन फ्री होल्ड करू व लोकांना मालकी हक्क देण्यासाठी प्रयत्न करू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.