Wednesday, May 14, 2025 11:12:23 PM

'... तर पाकिस्तानवर तहानेने मरण्याची वेळ येईल' - मुख्यमंत्री फडणवीस

पहलगाम घटनेनंतर भारताने निर्णायक पावलं उचलत, पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सिंधू पाणी करारदेखील तात्पुरता थांबवण्यात आला आहे.

  तर पाकिस्तानवर तहानेने मरण्याची वेळ येईल - मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला, त्यात महाराष्ट्रातील सहा जणांचाही समावेश आहे. या घटनेनंतर भारताने निर्णायक पावलं उचलत, पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सिंधू पाणी करारदेखील तात्पुरता थांबवण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाला आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सूचनेनुसार सर्व राज्यांना पाकिस्तानी नागरिकांविरोधात कठोर पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की, जे पाकिस्तानी नागरिक अधिकृत व्हिसावर भारतात आले आहेत त्यांच्यावर कार्यवाही केली जात आहे. त्यांना 48 तासांच्या आत देशाबाहेर पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच कोणतेही अवैध पाकिस्तानी नागरिक सापडल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरदार इशारा दिला आहे की पाकिस्तानची अनेक बाबतीत भारतावर अवलंबित्व आहे. त्यांनी म्हटलं की जर भारताने सिंधू नदीचे पाणी रोखले तर पाकिस्तानमध्ये अक्षरशः तहानेने मृत्यूची परिस्थिती निर्माण होऊ शकते. पाकिस्तानने भारतविरोधात दहशतवादी कारवाया सुरू ठेवल्यास त्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा सूचक इशारा त्यांनी दिला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटलं की, पाकिस्तान सरकार दहशतवाद्यांना मूक पाठिंबा देत आहे आणि मानवतेचा छळ करत आहे. अशा स्थितीत जगातील कोणताही प्रगत देश पाकिस्तानच्या बाजूने उभा राहणार नाही, असे ते म्हणाले. पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत डळमळीत आहे आणि ते न्यूक्लियर बॉम्बबद्दल मोठ्या गप्पा मारतात, हे फारच हास्यास्पद असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले.

सिंधू करार स्थगितीचा पाकिस्तानवर मोठा परिणाम
23 एप्रिल रोजी भारत सरकारने सिंधू पाणी करार थांबवण्याचा निर्णय घेतला. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, पाकिस्तान या पाण्यावर अत्यंत अवलंबून आहे. जर भारताने हा जलप्रवाह रोखला, तर पाकिस्तानमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होईल आणि त्यांच्यावर तहानेने मरण्याची वेळ येईल. त्यामुळे भारताने आता ठोस आणि कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

पहलगाममध्ये झालेल्या या भीषण हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा मृत्यू झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली आहे. राज्य सरकार या कुटुंबांना आवश्यक असलेली सर्व मदत पुरवेल, अशी माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली


सम्बन्धित सामग्री