Saturday, March 07, 2026 02:44:51 AM

Dharashiv Zilla Parishad Election 2026 : 55 गटांसाठी 967 उमेदवार रिंगणात, चुरशीची लढत रंगणार

जिल्ह्यातील पारंपरिक राजकीय समीकरणे, स्थानिक नेत्यांचा प्रभाव, तसेच बंडखोर उमेदवार यामुळे निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे.

dharashiv zilla parishad election 2026  55 गटांसाठी 967 उमेदवार रिंगणात चुरशीची लढत रंगणार

धाराशिव जिल्हा परिषद महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागातील धाराशिव जिल्ह्यात आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस बीड, पूर्वेस लातूर, दक्षिणेस सोलापूर तर पश्चिमेस अहमदनगर जिल्हा आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 7,569 चौ.कि.मी. असून भूभाग मुख्यतः सपाट व पठारी आहे. काळी व मध्यम काळी जमीन प्रामुख्याने आढळते. सीना ही प्रमुख नदी असून तेरणा व मनजरा या उपनद्या आहेत. हवामान उष्ण व कोरडे असून पावसावर आधारित शेती केली जाते. जिल्ह्यात एकूण 8 तालुके असून जिल्हा परिषद ग्रामीण विकासाचे कार्य पाहते.

इतिहास : 

धाराशिव जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे. महाराष्ट्रात 1962 साली जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम लागू झाल्यानंतर धाराशिव (पूर्वी उस्मानाबाद) जिल्हा परिषद अस्तित्वात आली. ग्रामीण भागाचा विकास, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा आणि पंचायत व्यवस्थेचे बळकटीकरण हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट राहिले आहे.

ऐतिहासिकदृष्ट्या हा जिल्हा निजामकालीन हैदराबाद संस्थानाचा भाग होता. 1948 मधील पोलिस अ‍ॅक्शननंतर हा भाग भारतीय संघराज्यात विलीन झाला आणि 1960 साली महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर जिल्हा परिषद कार्यरत झाली. 2022 मध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव करण्यात आले.

जिल्हा परिषदेमुळे ग्रामीण प्रशासन अधिक लोकाभिमुख झाले असून विकास योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.  धाराशिव (पूर्वी उस्मानाबाद) जिल्हा परिषदेत आतापर्यंत प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस यांचे प्राबल्य राहिले आहे. अनेक वर्षे जिल्हा परिषदेची सत्ता ही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे होती. काही काळ शिवसेना आणि भाजप यांनीही प्रभाव वाढवला, मात्र एकूण पाहता जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी गटच अधिक प्रभावी ठरलेला आहे.

महा युती व महाविकास आघाडी यांच्यात स्पर्धा

अलीकडच्या काळात राज्यातील राजकीय बदलांमुळे महा युती व महाविकास आघाडी यांच्यात स्पर्धा वाढलेली दिसते. धाराशिवच्या तेर गटात हाय व्होल्टेज लढत होण्याची शक्यता आहे. येथे भाजप विरुद्ध शरद पवार गट अशी लढत पाहायला मिळणार आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून धाराशिव लोकसभेची निवडणूक लढविलेल्या आणि भाजप आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्याची शक्यता आहे.   सक्षणा सलगर यांनी तेर गटातून निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने आगामी काळात जिल्हा परिषदेच्या या गटात जोरदार राजकीय घमासान होण्याची शक्यता आहे.

धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत. महायुतीत असूनही भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात थेट संघर्ष होत आहे. त्याचबरोबर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काही मतदारसंघांत राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यातही स्पर्धा आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील सामना लक्षवेधी ठरत आहे. अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार निर्णायक ठरण्याची शक्यता असून जिल्ह्यात एकूणच बहुकोनी व चुरशीची राजकीय लढत रंगली आहे.

किती उमेदवार रिंगणात?

धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकूण 55 गटांसाठी 967 उमेदवार रिंगणात आहेत. विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत. उमेदवारांची संख्या जास्त असल्याने प्रत्येक गटात बहुकोनी लढत पाहायला मिळत असून प्रचारालाही वेग आला आहे.

जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समितीच्या 1462 जागांसाठी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी तब्बल  7695 अर्ज दाखल झाले आहेत. तर पंचायत समितीच्या 1462 जागांसाठी 13023 असे रेकॉर्डब्रेक अर्ज दाखल झाले आहेत. 12 जिल्हा परिषदांसाठी ही निवडणूक होत आहेत. 


सम्बन्धित सामग्री