Monday, March 09, 2026 02:44:30 AM

Tamhini Ghat Alternative Route: ताम्हिणी घाटातील वाहतूक कोंडीवर तोडगा निघणार? 50 किलोमीटर अंतर कमी करणारा 'हा' नवा मार्ग लवकरच होणार सुरू

दिघी बंदर हे आगामी काळात पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रासाठी दळणवळणाचे प्रमुख केंद्र ठरणार आहे. यामुळे भविष्यातील वाहतूक आणि आर्थिक विकासावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

tamhini ghat alternative route ताम्हिणी घाटातील वाहतूक कोंडीवर तोडगा निघणार 50 किलोमीटर अंतर कमी करणारा हा नवा मार्ग लवकरच होणार सुरू

रायगड: कोकणच्या किनारपट्टीवर वसलेले श्रीवर्धनमधील दिघी बंदर सध्या एका मोठ्या स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर आहे. हे बंदर लवकरच एक भव्य व्यावसायिक आणि लॉजिस्टिक हब म्हणून नावारूपाला येणार असून, राज्याच्या अर्थकारणाला यामुळे मोठी गती मिळणार आहे. या विकासाच्या गंगेला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा सध्यातरी 'ताम्हिणी घाट' हाच एकमेव प्रमुख दुवा आहे. परंतु, भविष्यातील वाढत्या दळणवळणाचा विचार करता, जुन्याच रस्त्यांवर अवलंबून राहणे धोक्याचे ठरू शकते. सुदैवाने, वेळ आणि पैशांची मोठी बचत करणारे दोन अत्यंत व्यवहार्य पर्यायी मार्ग प्रस्तावित आहेत. मात्र, 'दिव्याखाली अंधार' याप्रमाणे, सर्व काही दृष्टीक्षेपात असूनही केवळ दोन जिल्ह्यांतील प्रशासकीय समन्वयाच्या अभावामुळे हा विकासाचा वारू सीमेवरच अडखळून पडला आहे.

ताम्हिणी घाटमार्गामुळे दक्षिण रायगड, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील दळणवळण नक्कीच सोपे झाले. पुढे या मार्गाचे रुंदीकरण होऊन 'औरंगाबाद-नगर-पुणे-पौड-विळे' हा संपूर्ण मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाल्याने हे जिल्हे अधिक जवळ आले. यामुळे दिघी बंदराचा विस्तार आणि वाढती वाहतूक पाहता या घाटावर भविष्यात प्रचंड ताण येणार आहे.

यावर उपाय म्हणून पहिला उत्तम पर्याय म्हणजे, टाटाच्या धरण परिसरात मुळशी-वाघेवाडी-ताम्हिणी येथे नवा पूल उभारणे आणि डोंगरवाडी ते ताम्हिणी दरम्यान बोगदा तयार करणे. या कल्पक प्रकल्पामुळे सध्याचे दिघी ते पुणे हे अंतर तब्बल 30 किलोमीटरने कमी होऊ शकते आणि वाहतुकीचा मार्ग अधिक सुकर होऊ शकतो.

हेही वाचा: Maharashtra Budget Session: अधिवेशनाची रणधुमाळी, पण विरोधी पक्षनेते गायब; सरकारला मिळणार मोकळे मैदान?

याहूनही अधिक प्रभावी आणि गेमचेंजर ठरणारा दुसरा पर्याय म्हणजे 'माणगाव-कुंभे-कुंभ्याची वाडी-घोळ-पानशेत-पुणे' हा नवा मार्ग! हा रस्ता पूर्णत्वास गेल्यास दिघी ते पुणे हे अंतर चक्क 50 किलोमीटरने घटणार आहे. सद्यस्थितीत माणगाव तालुक्यात कुंभे धरणाचे काम प्रगतिपथावर असून, माणगाव ते कुंभेपर्यंतचा रस्ता आणि डोंगराखालून बोगदाही तयार झाला आहे. पुढे कुंभे ते कुंभ्याची वाडी असा रस्ताही आहे. म्हणजेच, 50 किमी अंतर आणि मौल्यवान वेळ वाचवणाऱ्या या महामार्गाचा बहुतांश टप्पा आधीच आकाराला आला आहे.

मग गाडी अडकलीये कुठे? तर ती अडकलीये प्रशासकीय अनास्थेपाशी! कुंभ्याची वाडी ते पुढे घोळपर्यंतचा जेमतेम सात किलोमीटरचा रस्ता अपूर्णावस्थेत आहे. या सात किलोमीटरपैकी चार किलोमीटरचा भाग रायगड जिल्ह्यात येतो, तर उर्वरित तीन किलोमीटरचा भाग पुणे जिल्ह्यात मोडतो. दुर्दैवाने, रायगड आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा एवढा मोठा अभाव आहे की, या छोट्याशा तुकड्यासाठी संपूर्ण पर्यायी मार्गाचे काम रखडले आहे. दोन जिल्ह्यांच्या हद्दीच्या वादात आणि उदासीनतेत या अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पाचे घोंगडे भिजत पडले आहे.

दिघी बंदर हे आगामी काळात पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रासाठी दळणवळणाचे प्रमुख केंद्र ठरणार आहे. याशिवाय, श्रीवर्धन, महाड आणि संपूर्ण दक्षिण कोकणात पर्यटनाला आलेले उधाण पाहता ताम्हिणी घाटात सुट्टीच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी आणि वाहनांच्या भल्यामोठ्या रांगा आता नित्याच्याच झाल्या आहेत. हा नवा मार्ग केवळ व्यावसायिक वाहतुकीलाच गती देणार नाही, तर कुंभे आणि परिसराला एका नव्या पर्यटन केंद्राचा दर्जाही मिळवून देईल. दक्षिण कोकणाकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी हा एक अत्यंत निसर्गरम्य आणि कमी अंतराचा पर्याय ठरू शकतो.

'इच्छा तिथे मार्ग' या न्यायाने, जर लोकप्रतिनिधींनी आणि दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाने मनावर घेतले, तर हा रखडलेला सात किलोमीटरचा प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतो. दिघी बंदराचे वाढते महत्त्व, पर्यटनाला मिळणारी चालना आणि वाहतुकीचा भविष्यातील ताण पाहता, ताम्हिणी घाटाला हे सक्षम पर्याय उभे करणे काळाची गरज बनली आहे. या प्रलंबित रस्ते प्रकल्पाकडे राजकीय इच्छाशक्तीने तातडीने लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे, तरच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा हा सेतू खऱ्या अर्थाने पूर्णत्वास जाईल.

हेही वाचा: Bollywood Actress Kajol: लेकीच्या जन्मानंतर काजोलने सर्वांनाच केले लांब, झाली होती वेडी..., कारणही स्वत:च सांगितलं


सम्बन्धित सामग्री