मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर मनसे आणि शिवसेना (शिंदे गट) मिळून सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली वेगात सुरू आहेत. त्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) राजकारणात मोठी उलथापालथ झाली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मनसेशी हातमिळवणी केली. बुधवारी कोकण भवन येथे खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसे नेते राजू पाटील यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची गट नोंदणी पार पडली. या नव्या आघाडीमुळे कल्याण-डोंबिवलीत महायुतीसोबतच 'मनसे' सत्तेत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत केडीएमसीमध्ये मनसेसोबत युती करण्यामागचं कारणं स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा- Bhaskar Jadhav : "राजकीय मतभेद बाजूला सारून..." भास्कर जाधवांच्या 'त्या' वक्तव्याने खळबळ; थेट शिंदेंना विनंती
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, "मनसेने कल्याण-डोंबिवलीमधील विकासासाठी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. महायुतीसोबत मनसेही आमच्यासोबत येत आहे. यापूर्वीही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसे पक्ष आमच्याबरोबर होता. भाजपा आणि शिवसेनेची युती आजची नाही. या युतीत आता मनसेचाही सहभाग झाला आहे. महापौर पदाकरिता रस्सीखेच वगैरे काही नाही. बहुमत नसणाऱ्यांनी स्वप्न पाहणे चुकीचे आहे. विकासाच्या मुद्द्यामध्ये मनसेने आम्हाला साथ दिली. आम्ही महायुतीतच सत्ता स्थापन करणार आहोत. आम्हाला कुणाच्याही प्रस्तावाची गरज नाही. मुंबई आणि इतर महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना अशी महायुतीचच सत्ता स्थापन होणार आहे".