विजय चिडे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेचे हुंडाबळी प्रकरण राज्यात गाजत आहे. ऐतिहासिक शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरातही दरवर्षी 6 विवाहितांचा हुंड्यासाठी बळी घेतला जातो. तर दीड हजारांपेक्षा अधिक विवाहित महिलांचा सासरी छळ केला जात असल्याची धक्कादायक माहिती सरकारी नोंदीवरून समोर आली आहे. जानेवारी ते एप्रिल 2025 या चार महिन्यात संभाजीनगरमधील 394 महिलांवर सासरच्या मंडळींनी छळ केला असल्याचे समोर आले आहे. आजही पुरोगामी महाराष्ट्रात हुंड्यासाठी छळ ही चिंतेची बाब आहे.
सासरच्या मंडळीकडून छळ होत असल्यास त्याची तक्रार भारोसा सेलकडे केली जाते. सन 2024 मध्ये भरोसा सेलकडे 1 हजार 556 तक्रारी आल्या आहेत. यातील 779 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. त्यात 513 प्रकरणांमध्ये समझोता करण्यात आला व पोलीस ठाण्यात 391 प्रकरणे वर्ग केली गेली. उर्वरित 285 प्रकरणात चौकशी सुरु आहे. जानेवारी ते एप्रिल 2025 या चार महिन्यांत 380 प्रकरणे दाखल झाली. त्यातील 48 तक्रारी पुरुषांच्या आहेत.
हेही वाचा : महाराष्ट्रातील सहा मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित
हुंडाबळीच्या गुन्ह्यांची वर्षनिहाय आकडेवारी
वर्ष 2021
हुंडाबळी - 5
छळ - 288
वर्ष 2022
हुंडाबळी - 4
छळ - 253
वर्ष 2023
हुंडाबळी- 8
छळ - 239
वर्ष 2024
हुंडाबळी - 6
छळ - 249
चालू वर्ष 2025 मध्ये 394 महिलांचा छळ झाल्याच्या तक्रारी दाखल आहेत.